जिल्हाधिकारी चौधरी यांच्यासह वरिष्ठ महसूल अधिकारी, कर्मचारी यांना लसीकरण
प्रतिनिधी / सांगली
कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू आहे. आज पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली (सिव्हील हॉस्पीटल) येथे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी लस घेतली. यावेळी त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी देण्यात येत असलेली लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी असून कोणतीही भिती न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी निवडणूक मारूती बोरकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे या महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रदीप दिक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपजिल्हाधिकारी महसूल विजया यादव, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील १७ केंद्रामध्ये सध्या लसीकरण सुरू आहे. लसीकरणापूर्वी येणाऱ्यांची नोंद घेऊन त्यांच्या अनुषंगीक तपासण्या करून लसीकरण केले जाते. लसीकरण झाल्यानंतरही तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना अर्धा ते एक तास ठेवले जाते. अशा प्रकारची अत्यंत चांगली सुविधा सर्व लसीकरण केंद्रावर उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी लसीकरण व्यवस्थितपणे सुरू आहे.
जिल्ह्यात यापूर्वीच आरोग्य क्षेत्रातील शासकीय व खाजगी अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे लसीकरण सुरू झालेले आहे. आता आपण स्वत: व महसूल विभागातील सर्व विभाग प्रमुखांनी लस घेतल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. या लसीच्या रिपोर्टनुसार ही प्रभावी लस आहे. यापुढे महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे. आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये कोणत्याही व्यक्तीला लसीकरणाचा गंभीर दुष्परिणाम झालेला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम यांनी लस सुरक्षित असून कोरोनापासून सुरक्षिततेसाठी ही लस वेळेत आणि कोणतीही भिती न बाळगता घेण्याचे आवाहन केले. निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनीही मनात भिती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन केले. लसीकरण होत असताना परिचारिका अंजली वेदपाठक यांनी लसीकरणाबाबत आवश्यक माहिती दिली.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ग्रामीण भागात ५ हजार ९५ तर शहरी भागात ४ हजार १४८ अशा एकूण ९ हजार २४३ जणांनी लस घेतली आहे. जिल्ह्यात आजपासून नवीन १६ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून आता एकूण ३३ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू आहेत.