पोलिस विभागाने अधिक सतर्कता बाळगून दक्षता घेण्याचे पालकमंत्र्यांनी दिले निर्देश
प्रतिनिधी / कडेगाव :
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ज्या गावात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे अशा प्रत्येक गावात प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबत पोलिस विभागाने अधिक सतर्कता बाळगून दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
कडेगाव येथील तहसील कार्यालयात कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, नगराध्यक्षा संगीता राऊत, मुख्याधिकारी कपिल जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.