शिक्षक बँक चेअरमन सुनिल गुरव यांचा आरोप
प्रतिनिधी / विटा
संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करीत असताना देशभरातील सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनानेच मुदतवाढ देऊन पुढे ढकलल्या आहेत. याचे ज्ञान असूनही विरोधी संचालकाना महामारीपेक्षा बँकेच्या सत्तेचे डोहाळे जास्त लागलेले आहेत, असा घणाघाती आरोप सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल गुरव यांनी केला.
सांगली जिल्हा शिक्षक समिती प्रमुख पदाधिकारी बैठकीत बँकेवर वारंवार होणाऱ्या आरोपांना चेअरमन गुरव यांनी उत्तर देत विरोधी संचालकांवर निशाणा साधला. यावेळी राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, राज्य संघटक सयाजी पाटील, पार्लमेंटरी बोर्डाचे किसन पाटील, शशिकांत भागवत, व्हा. चेअरमन महादेव माळी, संचालक यु. टी जाधव, शशिकांत बजबळे, श्रेणिक चौगुले, रमेश पाटील, बाळासाहेब आडके, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड उपस्थित होते, अशी माहिती गुरव यांनी दिली.
याबाबत चेअरमन गुरव यांनी दिलेली माहिती अशी, शिक्षक बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी सहा महिने आम्ही निवडणुकीची तांत्रिक पूर्तता केली आहे. शिक्षक समिती निवडणुकीला कोणत्याही क्षणी तयारीनिशी सज्ज आहे. सुज्ञ सभासद तुम्हाला तुमची जागा निवडणुकीत दाखवतीलच. तरीही विरोधकांना सत्तेचे दिवा स्वप्न पडत आहे, असा आरोप चेअरमन गुरव यांनी केला.
जुन्या ठेवींचे व्याजाचे दर 9 ते 9.5% टक्के होते. त्या ठेवींच्या मुदती पूर्ण होण्यासाठी अजून काही कालावधी गरजेचा आहे. ठेवीचे व्याजदर कमी केले तर त्याचा परिणाम दीर्घकाळाने होतो. परंतु कर्जावरील व्याजाचा दर आज कमी केला, तर त्याचा परिणाम मात्र लगेच होतो. याचे साधे ज्ञान दोन वेळा संचालक असणाराना नाही? ते लोक बँकेचे भले काय करणार? कर्जाचे व्याजदर नेहमी शिक्षक समितीनेच कमी केले आहेत. हा आजपर्यंतचा इतिहास सर्व सुज्ञ सभासदांना माहित आहे. आम्ही गत पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कर्जाचे व्याजदर खाली आणले आहेत. भविष्यातही सभासदांना निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका आहे. सभासदांना कोणताही भुर्दंड बसेल असे कृत्य आजपर्यंत आमच्या सत्ताधारी संचालक मंडळाने केले नाही. तुम्ही कितीही कांगावा अथवा डांगोरा पिटा, तुमच्या भूलथापांना सुज्ञ सभासद बळी पडणार नाहीत. तुमचे सत्तेचे स्वप्न हे दिवास्वप्नच राहणार, असा टोला चेअरमन गुरव यांनी लगावला.
दरवर्षी रिझर्व बँकेकडून ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. हे माहीत असूनही बँक सुस्थितीत नाही, असे म्हणणे म्हणजे अल्पज्ञानी संचालकाच्या बुद्धीची कीव येते. सत्तेसाठी वाट्टेल ते खोटेनाटे आरोप करणे, एककलमी कार्यक्रम विरोधकांनी बंद करावा आणि शिक्षक सभासदांची कामधेनू असणाऱ्या बँकेविषयीची बदनामी थांबवावी, असे आवाहन चेअरमन गुरव यांनी केले आहे.