सकाळ, संध्याकाळच्या फेऱ्यांना गर्दी; नोकरदार, विद्यार्थी, व्यापाऱ्यांवर बससाठी प्रतीक्षा करण्याची वेळ
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यशासनामध्ये एसटी महामंडळाचे विलिनीकरण करावे, यासाठी एसटी कर्मचाऱयांचा संप गेल्या नोव्हेंबरपासून सुरू आहे. संप काळात अनेक मार्गावरील बसच्या फेऱया बंद होत्या. पण काही प्रमाणात कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर एसटीने फेऱया सुरू केल्या. त्यामध्ये कोल्हापूर-सांगली मार्गावरील बस फेऱयाही सुरू आहेत. विशेष म्हणजे या मार्गावर प्रवाशांची प्रचंड असल्याने बसला गर्दी होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांवर बसची प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे.
कोल्हापूरहून सांगलीत आणि सांगलीतून कोल्हापूरमध्ये नोकरी, शिक्षण आणि व्यापाराच्या निमित्ताने दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यातील काही जण रेल्वेचा तर काही जण एसटीचा आधार घेतात. कोरोनामुळे रेल्वे प्रवासाला मर्यादा आल्यानंतर बहुतांश प्रवाशांनी एसटीला प्राधान्य दिले. पण गेल्या नोव्हेंबरपासून एसटीच्या कर्मचाऱयांचा संप सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात कोल्हापूर-सांगली, सांगली-कोल्हापूर मार्गावर दररोज प्रवास करणाऱयांची गोची झाली. कर्मचारी कामावर रूजू झाल्यानंतर दोन्ही आगारांनी बस सेवा सुरू केल्यानंतर प्रवाशांनी काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास टाकला.
एसटीनेही कर्मचाऱयांच्या उपलब्धनेनुसार फेऱ्या वाढविल्या. पण सकाळी आणि संध्याकाळी या मार्गावरील प्रवाशाची गर्दी सध्या येथील मध्यवर्ती बस स्थानकावर (सीबीएस) वाढताना दिसत आहे. अशीच अवस्था सांगली बस स्थानकावरही आहे. बसची संख्या कमी आणि प्रवाशांची संख्या जादा यामुळे बस पकडण्यासाठी चढाओढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या वेळेला कोल्हापूर व सांगली आगाराने बस संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.