कुपवाड / प्रतिनिधी
राज्यातील वस्त्रोद्योग व्यावसायाला कोरोना संकटाचा मोठा फटका बसला आहे. या उद्योगाला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त करून देण्याची गरज आहे. यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रोद्योग चालकांची सांगलीत लवकरच बैठक घेऊ. व्यासायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. अशी माहिती कृष्णाव्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे चेअरमन सतीश मालू यांनी दिली.
ते म्हणाले, कोरोना संकटात वस्त्रोद्योगाचे अतोनात नुकसान झाले आहे.हा उद्योग प्रचंड अडचणीत आहे. शासनाकडून मात्र अपेक्षित मदत या उद्योगाला होत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोनाचे संकट, उद्योगासमोरील अनंत अडचणी, शासनाचे दुर्लक्ष यामुळे वस्त्रोद्योगजक हतबल झाले आहेत. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात वस्त्रोद्योगाचे मोठे जाळे आहे. मात्र हा उद्योग आता डबघाईला आला आहे. या उद्योगाला ‘बुस्टर’ ची गरज आहे. यासाठी नुकतीच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची शिष्टमंडळासह भेट घेतली.
यावेळी कुपवाड शिवसेना शहरप्रमुख अमोल पाटील, निखिल जैन, प्रसन्न शहा, नितीन चव्हाण, विक्रम पाटील, संतोष चिकने, निसार मुल्ला आदी उपस्थित होते. वस्त्रोद्योगासमोरील अडचणी संदर्भात मंत्री शेख यांच्याबरोबर सखोल चर्चा झाल्याचे सांगत मालू म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रोद्योग उद्योजकांची एक बैठक सांगलीत कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्स येथे घ्यावी अशी विनंती मंत्री शेख यांना केली आहे. त्यांनी तात्काळ याला होकार दर्शवविला आहे. लवकरच ते सांगली दौऱ्यावर येणार असून दोन्ही जिल्ह्यातील वस्त्रोद्योजकांची बैठक घेऊ, अशी ग्वाही शेख यांनी दिल्याचे मालू यांनी यावेळी बोलताना सांगितले.