सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचा पुढाकार ; माहिती मिळणार एका क्लिकवर
वार्ताहर / आळसंद :
बलवडी (भा.) ता. खानापूर येथील क्रांतीस्मृतीवनाला वृक्षांना पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ संलग्न असणाऱ्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातर्फे बारकोड बसविण्यात येणार आहे. यामुळे हुतात्म्यांच्या कार्याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे तरुणाईला वृक्षासमोर स्कॅनिंग केल्यानंतर माहितीचा खजिना उपलब्ध होणार आहे. क्रांतीस्मृतीवनाच्या वैभवात भर पडणार आहे.
२१ व्या शतकाच्या पुर्वसंध्येला येरळानदीकाठावर संपतराव पवारांनी लोकसहभागातून क्रांतीस्मृतीवनाची निर्मिती केली आहे. पाच एकर जागेत क्रांतीस्मृतीवन उभारले आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा झालेल्यांच्या नावाने सुमारे १०८ चिंच जातींच्या वृक्ष लावण्यात आले आहे. भारतातील सामुहिक एकमेव स्मारक आहे.
सध्या चिंचेच्या झाडाखाली हुतात्म्यांच्या नावाचे फलक लावण्यात आले आहेत. प्रवेशद्वाराजवळ य. द. फडके यांच्या ” नाही चिरा नाही पणती ” पुस्तकांतील आधारे हुतात्म्यांच्या थोर मातांच्या नावे जांभूळ वृक्ष लावले आहेत. त्याचप्रमाणे सांगली – सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या नावे नारळाचे झाडे लावलेली आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या नावे जिजाऊ उद्यान उभारले आहे.
क्रांतीस्मृतीवनाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. या स्मृतीवनात तरुणाईला परिवर्तनावादी चळवळीशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात शंकरराव किर्लोस्कर व ग.प.प्रधान यांच्या नावाने स्मृतीस्थळ आहे. १९७२ ला झालेल्या इस्लामपूर येथील झालेल्या गोळीबाराचा मूक साक्षीदार असलेल्या वृक्षाचे काष्ठशिल्प उभारले आहे.
“क्रांतीस्मृतीवनात हुतात्म्यांच्या नावे लावण्यात आलेल्या वृक्षांसमोर स्कॅनिंग केल्यानंतर हुतात्म्यांच्या देशसेवेसाठी केलेली कार्यरत एका क्लिकवर उपलब्ध पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंठरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.”
डॉ. राजेंद्र जगदाळे, महासंचालक सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुणे