प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट वाढू लागले आहे. गुरूवारी एका दिवसात तालुक्यातील कार्वे येथील आठ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून रूग्ण सापडण्याचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. अशावेळी विटेकर आणि तालुकावासियांना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
खानापूर तालुक्यात सुरूवातीच्या कालावधीत कोरोनाचा प्रदुर्भाव फारसा दिसत नव्हता. मात्र जिल्ह्याबरोबर तालुक्यात देखील रूग्णसंख्या वाढू लागली. तालुक्याच्या अपवाद वगळता जवळपास सर्व गावातून कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. लेंगरे, साळशिंगे, भाळवणी, विटा शहर, गार्डी नागेवाडी अशी काही गावे तर कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती. सुदैवाने दिपावलीनंतर कोरोना अटोक्यात आला होता. रूग्णांची संख्या देखील कमी होत गेली.
आरोग्य विभाग मंदावला
कोरोना कालावधीत अत्यंत चांगले काम केलेला आरोग्य विभागाचे काम आता मंदावले आहे. ज्या तत्परतेने कोरोना कालावधीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी केली जात होती, तसे आता आढळून येत नाही. त्यामुळे नागरीक देखिल बिनधास्त झाले आहेत. वेळीच धोका ओळखून आरोग्य विभागाने सतर्क होण्याची गरज आहे.