कुपवाड / प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती व आरास साहित्य विक्रीसाठी सार्वजनिक जागेवर उभारलेल्या स्टॉलचे जागाभाड़े गत वर्षापासून तब्बल दहापटीने वाढवले आहे. वाढीव आकारणी गोरगरीब स्टॉलधारकांना न परवडणारी असून यावरून स्टॉलधारक चांगलेच संतापले आहेत. भाड़े आकारणीवरुन बुधवारी कुपवाडमध्ये स्टॉलधारकांनी मनपा अधिकाऱ्यांशी वाद घातल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते.
भरमसाठ भाड़ेवाढ तात्काळ रद्द करून नाममात्र आकारणी केल्याशिवाय भाड़े न भरण्याचा ठाम निर्णय यावेळी स्टॉलधारकानी घेतला. मनपा प्रशासन गरीबांना तारण्यासाठी आहे का मारण्यासाठी? असा सवाल स्टॉलधारकानी व्यक्त केला आहे. यावेळी व्यापारी नेते विजय खोत, दिनकर चव्हाण, व्यापारी संघटनेचे राजेंद्र पवार, रेवणनाथ व्हनकडे यासह शहरातील अन्य स्टॉलधारक उपस्थित होते.