विट्यात संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयावर हल्लाबोल
प्रतिनिधी / विटा
वीज बिल प्रश्नी आज विटा विभागीय महावितरण कार्यालयावर शेतकरी, घरगुती वीज ग्राहकांनी लक्षणीय आंदोलन केले. यावेळी दोन गाढव आणि कडक लक्ष्मीसह वाजतगाजत महावितरण कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात आली. आरोग्य सभापती दहावीर शितोळे, महाराष्ट्र राज्य औषध निर्माण परिषदेचे राज्य अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह शेतकरी, वीज ग्राहक उपस्थित होते.
गोरगरिबांची वीज जोडणी कर्मचारी काहीही ऐकून न घेता तोडत आहेत. एखाद्या बड्या नेत्याचे, श्रीमंतांचे कनेक्शन तोडलेले दाखवा?, असा सवाल शंकर मोहिते यांनी अधिकाऱ्यांना विचारला. लोक पैसे देण्यास तयार असताना कशासाठी मनमानी पद्धतीने वीज तोडणी करता ? मीटर खराब असताना आलेली वीज बिले वेळेत दुरुस्त करून मिळत नाहीत. याबाबत कोणी विचारत नाही म्हणून कसेही कामकाज चालवणार काय ? असा संतप्त सवाल मोहिते यांनी विचारला.
महावितरणकडे मीटर उपलब्ध असताना ग्राहकांना बाहेरून दोन तीन हजाराला मीटर विकत घ्यायला लावले जात आहेत. बिघाड झालेले मीटर बदलून देण्याची जबाबदारी कुणाची ? मीटर बदलून न देता अंदाजे हजारो रुपयांची बिले ग्राहकांना पाठवली जात आहेत. महागाई मुळे आधीच जनता त्रस्त झाली असताना ग्राहकांना नाहक त्रास देणे बंद करावे अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.
यावेळी गाढवांचा प्रतिकात्मक मोर्चा गाढव आणि कडक लक्ष्मीसह वाजतगाजत महावितरण कार्यालय आवारात दाखल झाला. कारभार सुधारला नाही आणि गोरगरिबांची कनेक्शन तोडली तर वीज तोडणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गाढवावरून वरात काढू, असा इशारा शंकर मोहिते यांनी दिला. यासाठी प्रसंगी गुन्हे दाखल झाले, तर जनतेसाठी तुरुंगात बसण्याची तयारी आहे, असे मोहिते, यावेळी म्हणाले. महावितरणचे विटा विभागाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शासनाचे धोरण आणि महावीतरणचा प्रत्यक्ष कारभार यांच्यात तफावत का? असा सवाल विजय पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला. मेडिकलचे वीज कनेक्शन तोडताना विचार करा. फ्रीजमध्ये महागडी आणि अत्यावश्यक औषधे असतात. त्यांच्या तिव्रतेवर, परिणामकारकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याला जबाबदार महावितरण राहील, असा इशारा पाटील यांनी दिला.