ग्रामसेवक पाठपुरावा करीत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप
प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील एरंडोली येथे राज्य मार्गाच्या दुरुस्तीसाठी खुदाई करतेवेळी पाण्याची मुख्य पाईप लाईन फुटल्याने एरंडोली गावाचा पाणी पुरवठा अद्याप बंदच आहे. ठेकेदाराने पाईप लाईन बदलावी आणि गावाचा पाणी पुरवठा पूर्ववत करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकाने ठेकेदाराकडे पाठपुरावा करून पाईप लाईन बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना ग्रामसेवक मात्र, या गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदाराचीच पाठराखण करीत आहे, असा आरोप एरंडोली ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामसेवकाच्या अनास्थेमुळे ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहिले असून, तात्काळ पाईपलाईन बदलून पाणी पुरवठा पूर्ववत न केल्यास येत्या दोन दिवसात रास्तारोको आंदोलन करण्याबरोबर राज्य मार्गाचे काम बंद पडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.