सत्ता गेल्याने भाजप नेते नैराश्यामध्ये : जयंत पाटील यांचा घणाघात
प्रतिनिधी / सांगली
पुण्यात एका महिलेने मजबूत केलेल्या मतदार संघात जावून निवडणूक जिंकलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. त्यामध्ये कसला पुरुषार्थ अशी बोचरी टीका पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलताना केली. सत्ता गेल्यानेच भाजप नेते फस्टेशनमध्ये आले आहेत. भाजप किती खालच्या पातळीवर गेली आहे हे गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेच्यावतीने येथील भावे नाट्यगृहामध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पुण्यातील कोथरुड मतदार मेधा कुलकर्णी यांनी चांगल्या कामातून मजबूत केला. विकास कामाच्या जोरावर त्यांनी संघावर पकड निर्माण केली होती. एका महिलेने मजबुत केलेल्या मतदार संघातून पुन्हा भाजपची सत्ता येणार असे सांगणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील यांनी स्वतः कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातून निवडणूक लढवावी लागली. एका महिलेला बाजूला ढकलून निवडणूक लढविलेले चंद्रकांतदादा म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहेत. त्यामध्ये कसला पुरूषार्थ त्यांनी शरद पवार यांच्यावरील टीका थांबवावी असे आवाहन, त्यांनी केले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करीत असल्याबाबत ते म्हणाले, पडळकर यांच्या वक्तव्यावरून भाजप किती खालच्या स्तरवर गेलेला आहे, हे जनतेला समजले आहे. पुन्हा सत्ता येणार असल्याच्या स्वप्नात असलेल्या भाजपची सत्ता गेल्यानं पक्षाचे वरिष्ठ नेते हताश झाले आहेत. पक्षच नैराश्यामध्ये असल्याचे दिसत असून त्यामुळेच खालच्या स्तरावर जावून टीका करीत आहेत. भाजपला त्याचे काहीही वाटत नाही हे दुर्दैवी आहे. त्यांना पक्षाची चिंता वाटू लागली आहे. पक्ष कसा टिकवाचा अशी समस्या भेडसावत आहे. प्रसिद्धीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केली जात आहे. चुकीचे बोलणाऱ्यांचे समर्थन करणे योग्य नाही, असे टिका जयंत पाटील यांनी केली.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री राठोड यांचे नाव पुढे येत असल्याबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीतील मंत्र्यांबाबत मागील दोन घटनांमध्ये तथ्य नव्हते. मंत्री राठोड यांचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध आहे की नाही ते तपासल्यानंतरच स्पष्ट होईल, दोषी असतील तर कारवाई होईल.