सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील चांदोली (वारणा) धरणात गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 28.62 टी.एम.सी. पाणीसाठा असून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे धरणातून 4400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरण 80 टीएमसी भरल्यानंतरच कोयनेचा विसर्ग सुरू केला जाईल असे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे. गेल्या दोन दिवसा पेक्षा पाऊस कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
वारणा धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. तर शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 67.20 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, आहे. धोम धरणात 8.04 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.36 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 7.55 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 3.42 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 20.51 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.28 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 94.37 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 4400 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 1400 क्युसेक्स, दुधगंगा धरणातून 1000 क्युसेक्स, कासारी धरणातून 1350 क्युसेक्स व कण्हेर धरणातून 24 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
विविध पुलांची पातळी
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 13.7 (45), आयर्विन पूल सांगली 23.1 (40) व अंकली पूल हरिपूर 28.3 (45.11).
80 टीएमसी भरल्यानंतर कोयानेतून विसर्ग
गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता कोयना धरणामध्ये 67.27 tmc पाणी साठा होता. धरण परिचलन सूची नुसार कोयना धरणातील पाणी साठा 80 tmc वर गेल्या नंतरच कोयना धरणातून कोयना नदी मध्ये पुराचा विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी आहे. विसर्गाबाबत प्रशासन व प्रसार माध्यमे यांना पूर्व सूचना दिली जाईल.असे कोयनेचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी कळविले आहे.