भाजपमध्ये स्थायी साठी रस्सीखेच : अंतिम चार नावांवर खल
प्रतिनिधी / सांगली
महापालिकेच्या स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. भाजपच्या चार सदस्यांचा स्थायी समितीमध्ये प्रवेश होणार आहे. यासाठी तब्बल १२ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. यापैकी चार नावे अंतिम करताना भाजप नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गतवेळी अंतिम क्षणी डावलल्याने भाजपमध्ये नाराजीनाटÎ उफाळून आले होते.
महापालिकेच्या स्थायी समितीमधील आठ सदस्य ऑगस्ट अखेर निवृत्त होत आहेत. यामध्ये भाजप 4, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. महापौर दिग्वीजय सुर्यवंशीही स्थायी समितीचे सदस्य होते. त्यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आणखी एक जागा रिक्त झाली आहे. दरम्यान येत्या 20 रोजी होणाऱ्या महासभेत नऊ स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. यामुळे इच्छुकांनी हालचाली गतीमान केल्या आहेत. सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपामध्ये आहे. भाजपचे स्थायी समितीवर वर्चस्व आहे. महापालिकेच्या निवडणूकीला आता दोन वर्षाचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे स्थायी समितीवर संधी मिळण्यासाठी भाजपमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
भाजपचे चार सदस्यांची स्थायीमध्ये निवड होणार आहे. यासाठी तब्बल १२ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये महिला व बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे-पाटील, उर्मिला बेलवलकर, सुब्राव मद्रासी, नसीम शेख, गणेश माळी, गजानन आलदर, कल्पना कोळेकर, प्रकाश ढंग, अस्मिता सलगर, ऍड. स्वाती शिंदे, जगन्नाथ ठोकळे यांचा समावेश आहे.
इच्छुकांची संख्या वाढल्याने चार सदस्यांची नावे अंतिम करताना भाजप वरिष्ठ नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गतवेळी स्थायीमध्ये डावलल्याने भाजपमध्ये नाराजीनाट्य निर्माण झाले होते. त्यामुळे भाजपकडून सावध पाऊले टाकली जात आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीतही अंतिम चार जणांच्या नावावर भाजपमध्ये एकमत झालेले नाही. नावे अंतिम करण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, मकरंद देशपांडे यांच्यामध्ये खलबते सुरु असल्याचे समजते.
स्थायीचा कार्यक्रम गुंडाळला
दुसरीकडे स्थायीवर वर्चस्व मिळविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने कंबर कसली होती. मात्र ऐनवेळी अंतर्गत कलहात त्यांचाच `कार्यक्रम’ होण्याची वेळ आल्याने आघाडीने स्थायीची नाद सोडल्याची चर्चा आहे. दरम्यान काँग्रेसकडून वर्षा निंबाळकर, शुभांगी साळुंखे व फिरोज पठाण यांनी पूर्ण ताकदीने नेत्यांच्याकडे संधी देण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीत सद्या शांततेचे वातावरण आहे.