वार्ताहर / भिलवडी
पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथील नम्रता मारुती मोरे (वय ३१) या मगरीने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्या. त्यांनी धाडसी वृत्ती दाखविल्याने मगरीच्या हल्ल्यातुन सहिसलामत वाचल्या.
चोपडेवाडी येथील कृष्णानदी काठावर आसणऱ्या गावपाणवठयावर नम्रता मोरे यांच्यासह अन्य दोन महिला धुणे धुत होत्या. आचानकपणे पाठीमागून पाण्यातून आलेल्या मगरीने त्यांच्यावर हल्ला केला. मगरीने त्यांच्या उजव्या दंडाला जबड्यात पकडून पाण्यात खेचायला सुरुवात केली. नम्रता यांनी मोठ्याने आरडा-ओरडा करीत हाताला जोराने हिसडा मारला यामुळे त्यांचा हात मगरीच्या जबड्यातुन निसटला गेला. मगरीच्या जबडयातुन हात सुटल्याने नम्रता पाणवठ्यावर पळत आल्या . सावधगिरी व धाडसामुळे मगरीच्या तावडीतुन त्यांचा जीव वाचला. मगरीचे दात उजव्या दंडात घुसल्याने त्यांच्या हाताला दुखापत होऊन त्या किरकोळ जखमी झाल्या. नागरिकांनी त्याना तात्काळ भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
या वर्षातील मगरीच्या हाल्ल्यातील ही पहिलीच घटना असून गर्दीच्या ठिकाणी आसणाऱ्या पाणवठ्यावर मगरीने महिलेवर हल्ला केला आहे. यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वारंवार होणाऱ्या मगरीच्या हल्ल्यामुळे कृष्णाकाठ भयभित झाला असून वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. चोपडेवाडी येथे ग्रामपंचायतीचा अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची कमतरता भासत आहे . यामुळे महीलांना नदी पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे . यामुळेच ही मगरीच्या हाल्ल्याची घटना घडली आशी चर्चा परिसरात होत आहे.