अधिकाऱ्यांना तंबी; नागरिकांच्या तक्रारीनंतर झाडाझडती
प्रतिनिधी / सांगली :
नागरिकांना जन्म-मृत्यूच्या दाखले वेळेत मिळाले पाहिजेत. यापुढे दाखले मिळत नाहीत अशी तक्रार येता काम नये, अशी तंबीच महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी जन्म-मृत्यू विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिली. महापौर सूर्यवंशी यांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांनी यापुढे असे होणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर महापौरांचा राग शांत झाला.
नागरिकांना सुलभ आणि तात्काळ जन्म-मृत्यूचे दाखले मिळावेत यासाठी ऑनलाईन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र नेटवर्क तसेच अन्य तांत्रिक कारणामुळे नागरिकांना दाखले वेळेत उपलब्ध होत नाहीत. ज्या नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया माहीत नाही. ते दाखले घेण्यास जन्म-मृत्यु नोंदणी विभागात येतात. मात्र इथेही अधिकारी, कर्मचऱ्याकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे केल्या होत्या.
या तक्रारीची महापौर सूर्यवंशी यांनी दखल घेत जन्म-मृत्यू विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारभार सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र नागरिकांच्या तक्रारी सुरूच होत्या. दरम्यान मंगळवारी येथील मंगलधाम येथे महापौर सूर्यवंशी एका बैठकीनिमित्त गेले होते. यावेळी जन्म-मृत्यू विभागाच्या कार्यालयासमोर नागरिक दाखल्यासाठी थांबले होते. त्यांनी महापौरांच्याकडे तक्रार केली. सूचना देऊनही कारभार न सुधारल्याने महापौर संतापले, त्यांनी थेट अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.
“ऑनलाईन प्रकिया सुलभ करा, तुम्हाला जमत नसेल तर सांगा पुढचे महापालिका पाहून घेईल. यापुढे दाखले वेळेत मिळत नसल्याची तक्रार येता काम नये, अशी तंबीच त्यांनी अधिकारी, कात्मचार्यांना दिली. महापौरांचा रुद्रावतारन पाहून अधिकाऱ्यांनी यापुढे असे होणार नाही याची ग्वाही दिली. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, भाजपा गटनेते विनायक सिंहासने आदी उपस्थित होते.