कुपवाड / वार्ताहर
आयुष्याच्या घडण्याच्या काळात पाचवीत असतानाच त्याला न बऱ्या होणाऱ्या डी एम डी सारख्या आजाराने ग्रासले. शरीराचा एक भाग निकामी होत असतानाही दहावी, बारावीची परीक्षा त्याने जिद्दीने दिली. घवघवीत यश मिळवले. गतवर्षी करोनावरही मात केली. पण गुरुवारी जीवनाची लढाई अर्ध्यावरच सुटली. आदित्य बाळू गायकवाड (२०) या युवकाच्या मृत्यूमुळे कुपवाड हळहळत आहे.
आदित्यचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित. आई, वडील शिक्षक. उपक्रमशील शिक्षक म्हणून वडिलांचा परिसरात गवगवा. मिरज तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळू गायकवाड आणि यशवंतनगर शाळेच्या शिक्षिका स्वाती ओंकारे यांचा आदित्य मोठा मुलगा. गेली अनेक वर्षे तो अंथरुणावर खिळून होता. तरीही जिद्दीच्या जोरावर उठता व बसताच नव्हे मान ही हलवता येत नसताना देखील दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत त्याने उत्तुंग यश संपादन केले होते. बारावीला तर देशभक्त आर.पी.पाटील विद्यालयात तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. इतकी त्याची जिद्द.
आई-वडिल किंवा लहान भाऊ अथकपणे त्याला जपत होते. तो बरा व्हावा यासाठी जगातील सर्व उपलब्ध उपचार त्यांनी करून पाहिले.
गत वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या शेवटी गायकवाड सरांसह आदित्यलाही कोरोनाची लागण झाली. रोग प्रतिकारक शक्ती कमी असूनही दवाखान्यात न जाता घरीच बरा होण्याचा त्याने निर्धार केला. आईने बाधित होऊनही उपचाराची जबाबदारी पार पाडली आणि या संकटातूनही तो बाहेर पडला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत अतिशय हुशार आणि सर्व खेळात अग्रेसर असणारा आदित्य पाचवीत असताना चालायचा बंद झाला. पण गेली दहा वर्षे सुरू असणारी त्याची झुंज अखेर गुरुवारी थांबली. गेले दशकभर गावात त्याच्या जिद्दीचे दाखले दिले जायचे. आता तिथेच हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी सांगलीतील स्मशानभूमीत रक्षाविसर्जन होणार आहे. मृत्यूनंतरही त्याच्या जिद्दीची आणि त्याला जपणाऱ्या कुटुंबाची चर्चा आहे. हळहळ आहे.