कुपवाड / प्रतिनिधी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कारखान्याकडून एसओपी नियमावलीचे पालन काटेकोर होत आहे का ? याबाबतची तपासणी जिल्हा उद्योग केंद्रामार्फ़त सुरु करण्यात आली आहे. तपासणीसाठी या विभागाकडून सहा भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली असून या पथकाकडून आतापर्यंत १२५ हुन अधिक कारखान्यांची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून विविध औद्योगिक वसहतीमधील कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक, निर्यातक्षम, सरळ प्रक्रिया उद्योग तसेच ज्या उद्योगांनी नियमांचे काटेकोर पालन करून कामगारांची कारखाना आवारात राहण्याची व्यवस्था केली आहे, अशा उद्योगांनाच कारखाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कुपवाड, मिरज व सांगलीसह सर्व एमआयडीसीत सुरु असलेल्या उद्योगांची तपासणी गेल्या आठवडयापासून सुरु झाली आहे. ही तपासणी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी व औद्योगिक महामंडळाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध भागात १४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरु आहे. तसेच उद्योग विभागाने जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसहतीमधील उद्योजकांची बैठक घेऊन कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी विद्या कुलकर्णी म्हणाल्या, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार विविध औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्यांना भेटी देऊन कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होते का नाही? याची तपासणी केली जात आहे. ही तपासणी सध्या प्राथमिक स्वरुपात असून यामध्ये पहिल्यांदा सर्वाना कड़क सूचना दिल्या जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील तपासणी मोहिमेत नियमांकडे कानाडोळा करणाऱ्यांवर कड़क कारवाई करण्यात येणार आहे.