प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा बैठकावर जोर, वाढता मृत्यूदर चिंताजनक
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता राज्यात परिस्थिती स्थिर होत असल्याचे चित्र आहे. तथापि जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर राज्यापेक्षा जास्त आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा बैठकावर जोर सुरु आहे. पण वाढती मृत्यूसंख्या चिंताजनक बाब आहे.
राज्याचा बाधितांचा मृत्यूदर 1.75 आहे. पण जिल्ह्याचा मृत्यूदर तब्बल 2.25 आहे. राज्यातील बाधितांची संख्या 54 लाखांपुढे पोहोचली आहे. यातील 48 ते 49 लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा आकडा 82486 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19 टक्के आहे. तर मृत्यूदर 1.53 टक्के आहे. सक्रीय रूग्णांचा विचार करता पुणे जिल्ह्याची संख्या सर्वाधिक आहे. पुणे आणि मुंबईतील रुग्णसंख्या सध्या घटू लागली आहे.
दुसरीकडे सांगली जिल्ह्याचा विचार करता सध्या जिल्ह्यात विविध कोविड हॉस्पिटल्समध्ये 15 हजारांवर रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत दाखल 1 लाख 1648 पॉझिटिव्हपैकी 2970 जणांचे मृत्यू झाले आहेत. रूग्णांच्या मृत्यूचे हे प्रमाण 2.25 टक्के आहे. जिल्ह्यातील रूग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होऊ लागली आहे. आठवड्यात रुग्णांची संख्या 2 हजाराने कमी झाल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मात्र वाढती मृत्यूसंख्या चिंताजनक बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकांमध्ये मृत्यूची चिंता जागवली जाते. अधिकाधिक कडक उपाययोजना करण्याच्या घोषणा होत आहेत. पण परिणाम शून्य दिसून येतो. प्रशासनाच्या लेखी कोरोना रुग्णांची वाढती मृत्यूसंख्या केवळ आकडेवारी आहे. पण घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटूंबच उद्ध्वस्त होत असल्याने जिल्हा हादरला आहे.
ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येकडे दुर्लक्ष
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी स्थिती आहे. जिल्ह्यात एक लाखांवर असणाऱ्या रुग्णसंख्येत नगरपालिका तसेच शहरी भागात 14500 वर रुग्ण आहेत. तर महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या 26 हजारांवर पोहोचली आहे. ग्रामीण भागात रुग्णांचा आकडा 61 हजारांच्या पुढे आहे. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम नाहीत. प्रशिक्षित कर्मचारी, नर्सेस आणि डॉक्टर्सचीही संख्या कमी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती कमी असल्याने किरकोळ आजार झाला तरीही कोरोनाच झाल्याची भिती निर्माण होत आहे. या दहशतीमुळे लक्षणे असणारेही दवाखान्यात जाण्यास घाबरू लागले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्रामीण भाग हादरला आहे.
कर्नाटकातील संख्याही मोठी
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी 48 तासातील कोरोना निगेटीव्ह अहवालाची अट आहे. पण कर्नाटकातील पॉझीटिव्ह रुग्ण राजरोसपणे महाराष्ट्रात येऊन उपचार घेत आहेत. सीमाभागातील अनेक गावांमध्ये लसीकरणासाठी कर्नाटकातून गर्दी होऊ लागली आहे. कर्नाटकात तपासण्याच होत नसल्याने सीमाभागातील नागरिक खोटे बोलून महाराष्ट्रात तपासण्या करून घेत आहेत. त्यामुळेही ग्रामीण भागातील आकडा वाढू लागला असल्याची चर्चा आहे.
लॉकडाऊन बंदोबस्ताचा फार्स
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन पुकारला आहे. नियमांचे पालन करण्यासाठी पोलीस पथके रस्त्यावर उतरली आहेत. परंतु बंदोबस्तावरील पोलीस मोबाईल आणि सोशल मीडियावरच ऍक्टीव्ह असल्याचे दिसते. मोकाट फिरणाऱ्याची तपासणी अपवादाने केली जाते. त्याचबरोबर सर्व दुकाने बंद असली तरी वस्तू सहजपणे उपलब्ध होतात. लॉकडाऊनमधील बंदोबस्ताचा हा फार्स असाच राहिल्यास कोरेना रुग्णांची संख्या कमी करणे अडचणीचे ठरण्याचीच अधिक भीती आहे.