कडेगाव तालुक्याचा सर्वाधिक 99.15, तर 325 शाळांचा 100 टक्के निकाल
प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा विक्रमी 97.22 टक्के निकाल लागला. यंदा दहावीच्या निकालात तब्बल 13 टक्क्यांनी वाढ झाली. उत्तीर्णामध्ये मुलींचे सर्वाधिक 98.42 टक्के प्रमाण आहे. यंदाही बारावीनंतर दहावीच्या निकालातही पुन्हा मुलींनी बाजी मारली. कडेगाव तालुक्याची बारावीनंतर पुन्हा दहावीमध्येही सर्वाधिक 99.15 टक्के निकालाची नोंद झाली. मिरज तालुक्यात सर्वात कमी 96.40 तर 325 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. बहुतांशी विद्यार्थ्यांनी मोबाईलवरुन निकाल पाहिला.
मागील पंधरा दिवसांपासून दहावी निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यंदा निकाल पंधरा दिवसांनी लांबला, मात्र बुधवारी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यंदा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारीत वाढ झाली. कोल्हापूर विभागाचा निकाल 97.64 टक्के लागला असून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 98.21 टक्के लागला. सातारा जिल्हा 97.25 तर सांगलीचा 97.22 टक्के निकाल लागल्याने विभागात तिसरे स्थान मिळाले. जिल्ह्यात 38 हजार 473 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 37 हजार 402 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 16 हजार 268 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. उत्तीर्णामध्ये 12 हजार 963 विद्यार्थ्यांना प्रथम तर 6 हजार 769 व्दितीय श्रेणी मिळाली. यंदाही बारावीनंतर दहावीच्या निकालातही पुन्हा मुलींनी बाजी मारली. 17 हजार 667 मुलींपैकी 17 हजार 387 जणी उत्तीर्ण झाल्या, त्याचे प्रमाण 98.42 टक्के आहे. 20 हजार 806 मुलांपैकी 20 हजार 15 जण उत्तीर्ण झाले. मुलांची पास होण्याचे टक्केवारी 96.20 टक्के आहे.
पुर्नपरीक्षार्थीचा निकाल 75.14 टक्के
जिल्ह्यातून 2 हजार 867 पुर्नपरीक्षार्थींची नोंदणी झाली होती, त्यापैकी 2 हजार 848 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 2 हजार 140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 75.14 इतकी आहे. पुर्नपरीक्षार्थीमध्ये 18 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे. 48 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 105 विद्यार्थ्यांना व्दितीय श्रेणी मिळाली.
जिल्ह्यात बारावीच्या निकालानंतर दहावीमध्येही कडेगाव तालुक्याने बाजी मारली. तालुक्याचा सर्वाधिक 99.15 टक्के निकाल लागला. तर सर्वात कमी मिरज तालुक्यात 96.40 टक्के निकालाची नोंद झाली. आटपाडी तालुका 97.29, कवठेमहांकाळ 96.51, खानापूर 96.92, जत 96.77, पलूस 98.87, सांगली शहर 96.58, शिराळा 97.83, तासगाव 96.67 आणि वाळवा तालुक्याचा 98.08 टक्के निकाल लागला.
325 शाळांचा शंभर टक्के निकाल
जिल्ह्यातील 325 माध्यमिक शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 57 शाळांचा समावेश आहे. आटपाडी तालुका 23, जत 44, कडेगाव 21, कवठेमहांकाळ 13, खानापूर 28, मिरज 36, पलूस 28, शिराळा 26, तासगाव 13 आणि वाळवा तालुक्यातील 19 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. सांगली आणि मिरज शहरातील शाळांचा निकाल 96.58 टक्के लागला. येथील तब्बल 36 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.