डेअरी, बेकरी, किराणा, भाजीपाला घरपोच सेवेला परवानगी
मार्केट यार्ड किरकोळ दुकानदारांसाठी सकाळी सात ते अकरापर्यंत खुले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा मृत्यूदर राज्यापेक्षा अधिक असून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी सात दिवस कडक लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत याबाबत माहिती दिली. बुधवारपासून किराणा, डेअरी, बेकरी, भाजीपाला, फळविक्रेत्यांना घरपोच सेवेला परवानगी दिली आहे. 19 ते 22 मे दरम्यान सकाळी सात ते अकरापर्यंत मार्केट यार्ड फक्त किरकोळ विक्री दुकानदारांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. शेती विषयक सेवांनाही अशीच परवानगी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, बेक्र द चेन अंतर्गत 5 ते 15 मेपर्यंत पहिला, त्यानंतर 18 मे पर्यंत दुसरा कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची मुदत आज सकाळी सात वाजता संपणार असली तरी दिवसभर ते लागू असतील. पालकमंत्री आमदार,खासदार आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा लॉकडाऊन वाढीचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 19 ते 26 मे रोजी सकाळी सातपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 19 ते 22 मे दरम्यान केवळ मार्केट यार्ड सकाळी सात ते अकरा सुरू राहील. जिल्ह्यातील किरकोळ किराणा माल विक्रेत्या दुकानदारांनाच त्यावेळेत माल खरेदी करता येणार आहे. व्यक्तीगत कोणालाही परवानगी नाही.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहतील. रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व या सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी आहे. लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व संबंधित उत्पादन व वितरण. अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरूस्तीसाठी स्पेअर पार्टस्ची दुकाने याच वेळेत सुरू राहतील. दूध विक्री केंद्रे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरु राहतील. घरपोच दूध वितरणास परवानगी असेल
किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवेची परवानगी असेल. दुकानांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू, सेवा किंवा पार्सल देता येणार नाही. त्यांच्याकरता दुकाने उघडता येणार नाहीत. शेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी बियाणे, खाते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा सकाळी 7 ते 11 सुरु राहतील.
शिवभोजन थाळी फक्त पार्सल सुविधा सुरु राहील. शीतगृहे व गोदाम सेवा, स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम, त्यांच्या सार्वजनिक सेवा, वस्तूंची वाहतूक, पाणीपुरवठा, प्रसार माध्यमे, पेट्रोल, डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने, वैद्यकीय वाहने व शासकीय धान्य पुरवठा वाहने, प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मीडियाचे कर्मचारी, मालवाहतूक करणारी वाहने आदीं साठीच सुरु राहतील.
अशा वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्पेअरपार्ट दुकानधारकांनी सरळ गॅरेजमध्ये सेवा द्यावी, ही दुकाने बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड, नियमांचे पालन न करणाऱयाला दुकानातून सेवा दिली तर दुकानावर 1000 रुपये दंड आकारला जाईल.
आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.