प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येवू लागला आहे. मंगळवारी जिल्ह्यातील दहा तालुक्यामधील पाच तालुक्यात दहा पेक्षा कमी नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. मंगळवारी नवीन 163 रूग्ण वाढले, तर 305 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 589 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 20 वाढले
महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात येवू लागला आहे. गेल्या काही दिवसपासून महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णसंख्या आता हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कमी झाली आहे. मंगळवारी मनपा क्षेत्रात 20 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये सांगली शहरात दहा तर मिरज शहरात दहा रूग्ण वाढले आहेत. आजअखेर महापालिका क्षेत्रात 15 हजार 791 रूग्ण आहेत. त्यातील 91 टक्के रूग्ण बरे झाले आहेत.
पाच तालुक्यात दहा पेक्षा कमी रूग्ण
महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात येत असतानाच तो आता ग्रामीण भागातही आटोक्यात येवू लागला आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, कडेगाव, पलुस या पाच तालुक्यात दहा पेक्षा कमी रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात एकूण 143 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात सहा, कवठेमहांकाळ तालुक्यात पाच, मिरज तालुक्यात सात, कडेगाव तालुक्यात नऊ आणि पलूस तालुक्यात सहा रूग्ण वाढले आहेत. तर खानापूर तालुक्यात 16, तासगाव तालुक्यात 15, जत तालुक्यात 31, शिराळा तालुक्यात 11 आणि वाळवा तालुक्यात 37 रूग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात उपचार सुरू असताना नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मिरज शहरात एक आणि कुपवाड शहरातील एकाचा मृत्Îू झाला आहे. आटपाडी तालुक्यातील एकाचा, कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मिरज तालुक्यातील एकाचा, वाळवा तालुक्यातील दोघांचा आणि खानापूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. आजअखेर एक हजार 589 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
नवीन रूग्ण 163
उपचारात 2440
बरे झालेले 39207
एकूण 43236
मृत्यू 1589