प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढल्याने जिल्ह्यात आठ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. उद्या ५ मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही आज ही मोठी घोषणा केली. आपल्या सर्वांचा जीव वाचणं महत्वाचा आहे त्यासाठीच लॉकडाऊनची गरज असल्याचं भावनिक आवाहन त्यांनी केलं.
लॉकडाऊन हा एकमेव पर्याय
काल सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५६८ वर पोहोचली तर ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही बाब अतिशय गंभीर आहे. परिस्थिती आटोक्यात आणायची असेल, तर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय आम्ही घेत असल्याचे त्यांनी ट्विट केले.
सांगली जिल्हा ऑक्सिजनवर
आपल्याला ऑक्सिजन काठावर मिळतंय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी बुधवार दि. ५ मे रोजी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाईल.
जीवनावश्यक वस्तूंपेक्षा जीवन महत्त्वाचे
जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करतो. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा!
– पालकमंत्री जयंत पाटील