प्रतिनिधी / सांगली
जिल्हय़ात मंगळवारी 112 रूग्ण वाढले तर त्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 136 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाला मोठा दिलासा मिळाला आहे. उपचार सुरू असताना 14 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील नऊ जणांचा आणि परजिल्हय़ातील पाच जणांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 165 जणांचे आजअखेर कोरोनाने बळी गेले आहेत.
महापालिका क्षेत्रात 86 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात गेल्या आठवडय़ापासून 100 हून अधिक रूग्ण वाढत होते. पण मंगळवारी मात्र अवघे 86 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 62 तर मिरज शहरात 24 रूग्ण वाढले आहेत. महापालिकेकडून मोठय़ाप्रमाणात ऍण्टीजन टेस्ट सुरूच ठेवल्या आहेत. आजपर्यंत साडेसात हजाराहून अधिक जणांच्या त्यांनी ऍण्टीजन टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये मोठयासंख्येने रूग्ण वाढत चालले आहेत. पण मंगळवारी या टेस्टमध्येही अनेकजण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण आता कमी होत चालले आहे. सांगली शहरात जे नवीन रूग्ण वाढले आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आहेत. गावभाग, खणभाग, विश्रामबाग, शंभरफुटी रोड, शामरावनगर, हनुमाननगर, सांगलीवाडी या भागातील हे रूग्ण आहेत. तर मिरजेत जे रूग्ण आढळून आले आहेत. हे रूग्ण गावठाण भागातील आहेत. मिरजेत फक्त 24 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या तीन हजार 100 झाली आहे.
ग्रामीण भागात 26 रूग्ण वाढले
सांगली महापालिका क्षेत्रात मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढत असताना ग्रामीण भागात मात्र रूग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण आटोक्यात येत चालले आहे. मंगळवारी ग्रामीण भागात 26 रूग्ण आढळून आले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात दोन, जत तालुक्यात दोन तर कवठेमहांकाळ तालुक्यात पाच रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात दोन, मिरज तालुक्यात नऊ पलूस तालुक्यात दोन तासगाव तालुक्यात तीन आणि वाळवा तालुक्यात एक रूग्ण वाढला आहे. असे एकूण 26 रूग्ण ग्रामीण भागात वाढले आहेत.
जिल्हय़ातील नऊ जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील नऊ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 62 वर्षीय व्यक्तीचा सांगली सिव्हीलमध्ये तर 60 वर्षीय महिलेचा मिरजेच्या कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला आहे. विश्रामबाग येथील 32 वर्षीय व्यक्तीचा आणि हरीपूर रोड येथील 35 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मिरजेतील सिध्दार्थ कॉलनी येथील 60 वर्षीय महिलेचा तसेच विटा येथील 85 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. कुपवाड येथील 50 वर्षीय व्यक्तीच विवेकानंद हॉस्पिटलमध्ये तर कसबे डिग्रज येथील 61 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील बागणी येथील 70 वर्षीय महिलेचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या नऊजणांच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 165 झाली आहे.
परजिल्हय़ातील पाच जणांचे मृत्यू
कोल्हापूर जिल्हय़ातील चौघांचे मृत्यू झाले आहेत. तर बेळगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ येथील 68 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे 70 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. नांदणी येथील 85 वर्षीय व्यक्तीचा सेवासदन मिरज येथे मृत्यू झाला तर इचलकरंजी येथील 69 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्हय़ातील 40 वर्षीय महिलेचा मिरजेत कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. परजिल्हय़ातील 52 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
सांगलीला प्रथमच दिलासा कोरोनामुक्तांची संख्या वाढू लागली
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 4986
बरे झालेले 2292
उपचारात 2529
मयत 165