प्रतिनिधी /सांगली
सांगली जिल्हय़ात कोरोनाचे 225 नवीन रूग्ण वाढले, तर 106 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात 148 रूग्ण वाढले तर ग्रामीण भागात 77 रूग्ण वाढले आहेत. शुक्रवारी नऊ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात एकूण 127 जणांचे बळी गेले आहेत.
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची वाढच
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही. शुक्रवारी 148 रूग्ण महापालिका क्षेत्रात वाढले आहेत. यामध्ये सांगली शहरात 113 तर मिरज शहरात 35 नवे रूग्ण वाढले आहेत. यातील ज्या रूग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत तसेच सौम्य लक्षणे आहेत त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. पण ज्या रूग्णांना कोरोनाचा त्रास होत आहे. त्या रूग्णांना मात्र हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. शुक्रवारी सांगलीत गावभाग, खणभाग, शंभर फुटी रोड, शामरावनगर, हनुमाननगर, विश्रामबाग या परिसरातील रूग्ण वाढले आहेत. तर मिरज शहरात वाढलेले रूग्ण हे गावठाण सह उपनगरी भागात मोठयाप्रमाणात आहेत. सांगली महापालिकेकडून ऍण्टीजन टेस्ट सुरूच ठेवल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. आज अखेर सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या अडीच हजाराच्या पार गेली आहे.
ग्रामीण भागात 77 रूग्ण वाढले आहेत
सांगली महापालिका क्षेत्रात 148 रूग्ण वाढले आहेत. तर इतर ग्रामीण भागात मात्र रूग्णसंख्या कमी प्रमाणात वाढत आहे. ग्रामीण भागात फक्त 77 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात चार, जत तालुक्यात दोन, कडेगाव तालुक्यात पाच, कवठेमहांकाळ तालुक्यात तीन, खानापूर तालुक्यात चार रूग्ण वाढले आहेत. मिरज तालुक्यात मात्र मोठयाप्रमाणात रूग्ण वाढले आहेत. याठिकाणी 27 रूग्ण वाढले आहेत. तर पलूस तालुक्यात 13 रूग्ण वाढले आहेत. शिराळा तालुक्यात पाच रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात सात, वाळवा तालुक्यात सात रूग्ण वाढले आहेत. असे एकूण 77 रूग्ण वाढले आहेत.
नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
शुक्रवारी मात्र जिल्हय़ात नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. यामध्ये सांगली शहरातील खणभाग येथील 62 वर्षीय महिलेचा घाटगे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. तर सांगली शहरातीलच 80 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मिरज येथील 82 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. तासगाव शहरातील 75 वर्षीय व्यक्ती तसेच आरवडे येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जत येथील 46 वर्षीय व्यक्तीचा मेहता हॉस्पिटलमध्ये तर बालेगाव येथील 60 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यातील खंडेराजूरी येथील 36 वर्षीय महिलेचा सिव्हील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. तर कुपवाड येथील 58 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. या नऊ जणांच्या मृत्यूने जिल्हयात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या आता 127 झाली आहे.
जिल्हय़ात विक्रमी 106 रूग्ण कोरोनामुक्त
जिल्हय़ात शुक्रवारी 106 जणांच्यावर कोरोनाचे पूर्ण उपचार झाल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचे मोठय़ाप्रमाणात रूग्ण बरे होत असल्याने कोरोनाने बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या आता 1783 झाली आहे.
एकूण रूग्णसंख्येने चार हजारांचा आकडा गाठला
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या मोठय़ासंख्येने वाढत चालली आहे. त्यामुळे एकूण कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी कोरोना रूग्णांच्या संख्येने चार हजाराचा आकडा पार केला आहे. एकूण रूग्णसंख्या आता चार हजार 199 झाली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 4199
बरे झालेले 1783
उपचारात 2289
मयत 127