केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, रूग्णसंख्या वाढल्याने जिल्हा पुन्हा चौथ्या स्तरात
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट कमी झाल्याने आजपासून निर्बंध शिथिल होण्याची आतुरता लागलेल्या व्यापारी आणि नागरिकांची निराशा झाली आहे. कौरोना रूग्णांची संख्या वाढल्याने 19 जुलैपर्यंत निर्बंध कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंदच राहणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची मुदत सोमवारी संपणार आहे. त्यामुळे आजपासून नियमांचे पालन करून सर्व व्यापार सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महापालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. त्यावर पॉझिटीव्हीटी रेट कमी आल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट दहा टक्क्यांच्या खाली आल्याने आजपासून सर्व व्यवसाय सुरू होतील याबाबत व्यापारी आणि नागरिक आशावादी होती. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. परंतू आरोग्य विभागाने गत संपणाऱया आठवड्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्हा अजूनही चौथ्या स्तरामध्येच आहे. त्यामुळे 19 जुलैपर्यंत निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
रविवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, कोविड पॉझिटीव्हीटी दरानुसार राज्यातील जिल्हे 1 ते 5 स्तर मध्ये विभागले आहेत. राज्य शासनाकडील आदेशान्वये फक्त आरटीपीसीर चाचणी अहवालानुसार कोव्हिड पॉझिटीव्हीटी दर निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार 9 जुलै रोजी संपणाऱ्या आठवड्यांचा सांगली जिल्ह्यातील कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के पेक्षा जास्त व 20 टक्के पेक्षा कमी आहे. तसेच राज्य शासनाच्या आदेशानुसार कोव्हिड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात येणाऱया निर्बंधाविषयी निर्णय घेत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लगतच्या दोन आठवड्याचा आरटीपीसी चाचणीचा पॉझिटीव्हीटी दर विचारात घ्यावा, असे निर्देश दिलेले आहेत.
त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्तर चारप्रमाणे पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास 19 जुलै 2021 रोजीचे पहाटे पाच वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार केवळ सध्याप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत.