प्रतिनिधी/सांगली
राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जिल्हय़ात अंमलबजावणी केली जात असून 93 हजार 290 शेतकऱयांना 722 कोटी 86 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. संबंधित शेतकऱयांची ऑनलाईन माहिती भरण्याचे काम 15 जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेतून अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठी योजनेचा लाभ मिळणार असून थकबाकीदारांचे दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ होणार आहेत. जिल्हा बँकेतील 52 हजार 714 थकबाकीदार शेतकऱयांना 583 कोटी 35 लाख तर राष्ट्रीयकृत बँकांच्या 23 हजार 208 शेतकऱयांना 290 कोटी 10 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱयांना आवाहन केल्यानंतर बँक खात्यांशी आधार कार्ड चार हजार शेतकऱयांनी जोडले आहे. अद्यापही 4 हजार 42 शेतकऱयांनी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केलेला नाही. तो तातडीने करुन घ्यावा.
जिल्हा बँकेकडील केवळ 176 खातेदार आधार क्रमांक लिंक शिवाय तर राष्ट्रीयकृत बँकेतील तीन हजार 866 खातेदारांनी बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेला नाही. 15 जानेवारीपर्यंत सर्व 28 रकान्यात ऑनलाईन माहिती भरली जाईल. या सर्व याद्या बँक, ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द केल्या जातील. सामाजिक लेखा परीक्षणानंतर या याद्यांमध्ये बदल होवू शकतो. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनीही कर्जमाफीबाबत माहिती दिली.