प्रतिनिधी / सांगली
शनिवारी जिल्हय़ात विक्रमी नवे 575 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रूग्णसंख्या अकरा हजाराच्या जवळ जावून पोहचली आहे. 343 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 20 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 18 जणांचा आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 446 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात एकूण रूग्णसंख्येने सहा हजाराचा आकडा पार केला
महापालिका क्षेत्रात शनिवारी पुन्हा एकदा 203 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 130 तर मिरज शहरात 73 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात मोठयाप्रमाणात रूग्ण वाढतच चालले आहेत. महापालिका क्षेत्रात समुह संसर्ग वाढल्याने मोठय़ासंख्येने रूग्ण वाढत आहेत. या वाढत्या रूग्णसंख्येला पायबंद घालण्यासाठी लोकांच्याकडूनच आता प्रयत्न होणे गरजेचे आहे. पण ते प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यातच मनपाकडून रॅपीड ऍण्टीजन टेस्टही मोठय़ाप्रमाणात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिकेकडून वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी अनेक ठोस उपाययोजना केल्या आहेत. पण या उपाययोजनाही आता तोकडय़ा पडत चालल्या आहेत. मिरजेत नवीन 73 रूग्ण वाढलेले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या सहा हजार 157 झाली आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच 372 रूग्ण वाढले
शनिवारी ग्रामीण भागातही मोठय़ासंख्येने रूग्ण वाढले आहेत. नवीन 372 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 33, जत तालुक्यात आठ, कडेगाव तालुक्यात तब्बल 47 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 31, खानापूर तालुक्यात 48, मिरज तालुक्यात सर्वाधिक 73 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात आठ, शिराळा तालुक्यात 32, तासगाव तालुक्यात 27 आणि वाळवा तालुक्यात तर 65 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 372 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 18 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 18 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. विश्रामबाग येथील 63 वर्षीय व्यक्तीचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे तर आणि गुलमोहोर कॉलनी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील पाच जणांचे मृत्यू झाले आहेत. 80 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 30 वर्षीय युवकाचा वॉनलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. 90 आणि 60 वर्षीय व्यक्तीचा वॉनलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर 82 वर्षीय महिलेचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तासगाव तालुक्यातील येळावी येथील 80 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात येथे मृत्यू झाला. तासगाव येथील 65 वर्षीय व्यक्तीचा वॉनलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. शिराळा येथील 71 वर्षीय महिलेचा तसेच वाळवा तालुक्यातील करंजवडे येथील 63 वर्षीय महिलेचा एचडीएच इस्लामपूर येथे. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील 51 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कवलापूर येथील 62 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे. तसेच नागठाणे येथील 65 वर्षीय व्यक्तीचा हरीपूर येथील 45 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील चिखळहोळ येथील 35 वर्षीय व्यक्तीचा तसेच पलूस येथील विद्यानगरमधील 82 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे. तर कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील 38 व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 18 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 446 झाली आहे.
परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू
शनिवारी परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील शेडसाळ येथील 76 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात येथे तर सोलापूर जिल्हय़ातील सांगोला येथील 65 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 101 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
343 जण कोरोनामुक्त
शनिवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे 343 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण जरी मोठय़ासंख्येने वाढत असले तरीसुध्दा बरे होणाऱया रूग्णांची संख्याही वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या सहा हजार 636 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही सुधारत आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 10997
बरे झालेले 6636
उपचारात 3915
मयत 446