अतिरिक्त सीईओ गुडेवारांवरील शिस्तभंग कारवाई, ग्रामसेवकांची चौकशी, भिलवडी ग्रामपंचायती कामांवरून जोरदार खडाजंगी, अधिकारी धारेवर
प्रतिनिधी/सांगली
जिल्हा परिषदेची बुधवारी आयोजित केलेली अर्थसंकल्पीय सभा बजेट ऐवजी हे वैयक्तिक हेवेदाव्यावरून चांगलीच गाजली. अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाईचे काय झाले, भिलवडी ग्रामपंचायत चौकशी, वादग्रस्त ग्रामसेवकावर कारवाई करण्यात अधिकाऱयांकडून होत असलेली टाळाटाळ, रस्ते कामांच्या एनओसीवरून सभेत सदस्य अधिकाऱयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अधिकारी सुपारी घेऊन काम करतात अशा अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत सदस्यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. यावेळी सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने प्रचंड गदारोळ झाल्याने सभेचा आखाडा बनला. दरम्यान भिलवडी प्रकरणात अखेर गुडेवार यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सभागृह शांत झाले.
येथील वसंतदादा सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती जगन्नाथ माळी, प्रमोद शेंडगे, आशा पाटील, सुनीता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीसच राष्ट्रवादीचे सदस्य अर्जुन पाटील व भाजपचे सुरेंद्र वाळवेकर यांनी गुडेवार यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईचे काय झाले अशी विचारणा केली. प्रारंभीच वादाचा विषय उपस्थित झाल्याने सभागृह आक्रमक झाले. भिलवडी येथील ग्रामपंचायतीवर बरखास्तीची चौकशीपूर्व घोषणा कशी केली, असा जाब विचारत सदस्य वाळवेकर यांनी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत गुडेवार यांना धारेवर धरले. ग्रामपंचायतीने दलित लोकसंख्या नसतानाही तेथे दलितवस्ती योजनेतील निधी खर्च केला, अशी तक्रार होती.
या कामाची चौकशी करण्यापूर्वीच गुडेवार यांनी भिलवडी ग्रामपंचायत बरखास्तीची घोषणा केल्यामुळे ग्रामपंचायतीची बदनामी केली. जनतेचे मत बदलल्याने ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यानंतर गुडेवार यांनी तुम्ही मला बोलायला शिकवू नका, असे प्रत्युतर केले. त्यामुळे वाळवेकर यांच्यासह जितेंद्र पाटील, सरदार पाटील, अरुण बालटे, अर्जुन पाटील, ब्रह्मदेव पडळकर हे सदस्य संतप्त झाले. व्यासपीठावरील समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे हेही आक्रमक बनले. गुडेवार यांनी सदस्यांचा अपमान केला आहे, सदस्यांचा अपमान म्हणजे सभागृहाचा अपमान आहे त्यामुळे गुडेवार यांना सभागृहाबाहेर पाठवा अथवा त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी तरच सभा चालू देणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे सभागृहातील गोंधळामध्ये अधिकच भर पडली. सभागृहातील वातावरण तणावाचे बनले असतानाही अतिरिक्त सीईओ गुडेवार हे माफी मागण्यास तयार नव्हते. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी गुडेवार यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. हा सर्व गोंधळ सुरू असतानाच सदस्य तमाण्णागौडा रवी-पाटील यांनी डायसवर जाऊन बजेट महत्त्वाचे आहे त्यामुळे गुडेवार यांनी दिलगिरी व्यक्त करून विषय संपवावा, असे सीईओ डुडी यांच्या कानात जाऊन सांगितले. मात्र रवी पाटील हे अवमान करणाऱया अधिकाऱयांची बाजू घेत असल्याचा समज काँग्रेसचे सदस्य महादेव दुधाळ यांचा झाला यावरून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही यावेळी घडला. सदस्यांनी दोघांची समजूत काढल्याने वादावर पडदा पडला. त्यानंतर गुडेवार यांनीही दिलगिरी व्यक्त केल्याने सभागृह शांत झाले.
भिलवडी प्रकरणी दोषींवर कारवाई
भिलवडी ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती योजनेतील काम निकषाप्रमाणे केले असतानाही जाणीवपूर्वक ग्रामपंचायत बदनाम करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चुकीचा अहवाल देणाया दोषी अधिकाऱयांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केली. काम नियमाप्रमाणे केले असतानाही ही गावाची बदनामी करणे चुकीचा आहे अशा लोकांना पाठीशी घालणे योग्य नाही, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केल्याने याप्रकरणी दोषी असणाऱया सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश अध्यक्षा कोरे यांनी दिले.
वादग्रस्त ग्रामसेवकांच्या चौकशीसाठी समिती
सभेत वादग्रस्त ग्रामसेवकांचा विषयही जोरदार गाजला. सदस्य ब्रह्मदेव पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने घरांचे अतिक्रमण काढून टाकले. याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक दोषी असतानाही त्याच्यावरील कारवाईला टाळाटाळ केली जात आहे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे हे कारवाईस टाळाटाळ करीत असून ते भ्रष्ट अधिकारी आहेत. याप्रकरणाची चौकशी अन्य अधिकाऱयांकडे देण्यात यावी, अशी मागणी केली. आटपाडी ग्रामसेवकावरही कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप सदस्य बालटे यांनी केला. ग्रामसेवकावर कारवाईचा विषय आल्यास अधिकारी त्यांना बोलावून सेटलमेंट करतात असा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी भाजपचे सदस्य महादेव दुधाळ यांनी घरकुल अनुदानाचा हप्ता काढण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप केला. या विषयावरून सभागृहात वादळी चर्चा झाली. आटपाडी, वाळवा, पलूस, जत, आटपाडी या चार तालुक्यातील गटविकास अधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले. अखेर असे वादग्रस्त किती ग्रामसेवक आहेत. याबाबतची यादी तात्काळ सादर करण्याची मागणी उपाध्यक्ष डोंगरे यांनी केली. जिह्यातील वादग्रस्त ग्रामसेवकांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात येईल तसेच आटपाडीतील ग्रामसेवकांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी यावेळी सभागृहात स्पष्ट केले.
रस्ते कामाचा एनओसीवरून जितेंद्र पाटील-संभाजी कचरे यांच्यात खडाजंगी
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील रस्ते कामासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी निधी दिला आहे. मात्र ग्रामपंचायतीने दोन रस्त्यांच्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याने गटविकास अधिकायांनी ग्रामपंचायत बरखास्त का करू नये, याबाबतची नोटीस बजावली आहे. हा मुद्दा काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांनी उपस्थित केला. अधिकारी कोणाची तरी सुपारी घेऊन ग्रामपंचायत बरखास्तीची नोटीस देत आहेत. सरकारमधील मंत्र्यांच्या हस्तक्षेपावरुन कारवाई करीत असाल तर आम्हीही सरकारमध्येच आहे हे विसरू नका, असा असा इशारा दिला. पाटील यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे सदस्य संभाजी कचरे यांनी आक्षेप घेतला. कुणी सुपारी घेतली आहे, हे बीडीओनी जाहीर करावे. अधिकारी गुणवत्तेने बनले आहेत. अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. यावरून दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड व सदस्य संजीवकुमार पाटील यांनी कचरे यांची बाजू उचलून धरली.
फळपीक विम्याची अट शिथिल करण्याचा ठराव
द्राक्ष आणि डाळिंब बागांसाठी शासनाकडून फळपिक विमा योजना राबविली जाते. मात्र या विमा योजनेमध्ये बदल केल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत. जत तालुक्यात साडे बावीस हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. गतवर्षी जिह्याला 27 कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती नवीन निकषामुळे विमा भरपाई पासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे जुन्या निकषानुसार विमा लागू करावा, अशी मागणी तमण्णागौडा रवी पाटील यांनी केली. शिवाय जत तालुक्यातील 132 कन्नड शाळांमध्ये 75 पदे रिक्त आहेत. त्या शाळांना अल्पसंख्यांकचा दर्जा द्यावा, असा ठराव करण्यात आला. पेयजल योजनांचे काय झाले शिवाय ड यादीतील प्रधानमंत्री आवास घरकुलांचे अनेक लाभार्थी वंचित आहेत त्यांचा फेर सर्वे करण्याची मागणी केली. सदस्या स्नेहलता जाधव यांनी शेगाव जिल्हा परिषद गटामध्ये मिशन जलजीवन मधून बसवण्यात आलेल्या सौरपंपांचे काम निकृष्ट असल्याची तक्रार केली.