आ. अरूणअण्णा लाड : वर्धापनदिन विशेषांकाचे शानदार प्रकाशन : कोरोना योध्दा डॉ. साळुंखे यांचा सत्कार
प्रतिनिधी/सांगली
कोरोना, शेतकरी, उद्योग, आरोग्य यासह सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम `तरूण भारत’ने सातत्याने केले आहे. खऱया अर्थाने हे सर्वसामान्यांचे मुखपत्र आहे, असे गौरवोद्गार पुणे पदवीधर मतदारसंघाचे नूतन आमदार अरूणअण्णा लाड यांनी आज येथे बोलताना काढले. `तरूण भारत’च्या 28व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित `कोव्हिडनंतरचे जग’ या विशेषांकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
दरवर्षी `तरूण भारत’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येते. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्नेहमेळाव्याऐवजी साधेपणाने वर्धापनदिन साजरा केला. शुक्रवारी सकाळी गावभागातील दत्त मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना आ. लाड म्हणाले, आपण प्राथमिक शाळेत असताना कुंडलमध्ये असणाऱया वाचनालयातील वर्तमानपत्र वाचूनच दिवसभराच्या कामाला सुरूवात करत असू. त्यावेळी परिसराबरोबरच देशात घडणाऱया घडामोडी आणि क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड यांच्याबद्दलच्या बातम्या वाचायची उत्सुकता असायची. आजच्या स्पर्धेच्या युगातही `तरूण भारत’ची वाचक सेवा उत्तम आहे.
देशात कोव्हिडचा गंभीर प्रश्न आहे. उद्योगधंदे बंद आहेत. शेतकरी अडचणीत आहे. सरकारने अनुदानित शिक्षणातून अंग काढून घेण्यास सुरूवात केली आहे. देशाच्या राजधानीच्या शिवेवर कोटÎवधी शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्या समस्या कोणी जाणून घेताना दिसत नाही. त्यांचे प्रश्न अनेकांना समजतही नाहीत. जिथे या सर्व प्रश्नावर चर्चा होऊन निर्णयाची अपेक्षा असते त्या सभागृहात लोकप्रतिनिधी भलत्याच विषयावर दंगा करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजेत. अशा घटनांकडे माध्यमांनी लक्ष देण्याची अपेक्षाही आ. लाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
देशभरातील माध्यमे देशासमोरील सर्व प्रश्न सुटले आहेत अशा भ्रमात अभिनेत्री कंगना आणि सुशांतसिंग रजपूत या दोघांभोवतीच गोंधळ घालत आहेत. आजही जनतेचा प्रसारमाध्यमांवर विश्वास आहे, किरकोळ घटनांवर अवाजवी आवाज उठवणाऱया माध्यमांनी हे लक्षात घ्यावे, असे आवाहन केले.
सीमालढ्यावर जी.डी.बापूंनी आवाज उठवला
`तरूण भारत’ने सुरूवातीपासूनच जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला. क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड यांनीही सीमालढ्यावर आवाज उठवला होता. महिला, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर लिखाण असते. असे सांगतानाच `तरूण भारत’ने आपला हा वारसा यापुढेही निरंतर सुरू ठेवावा असे आवाहनही आ. लाड यांनी केले.
सांगलीचे संपादक मंगेश मंत्री यांनी `तरूण भारत’ सुरूवातीपासूनच वाचकांशी किंमतीपलीकडचे नाते जपत असल्याचे सांगितले. 101 वर्षापूर्वी स्व. बाबुराव ठाकुर यांनी तरूणांसाठी सुरूवातीला हस्तलिखीतमध्ये `तरूण भारत’ सुरू केले. अनेक संकटे आली. त्याला यशस्वीपणे तोंड देत `तरूण भारत’ची अखंड अक्षरेसवा सुरू आहे. कोणताही पक्ष, गट, जात, धर्म असे न मानता वाचकांशी किंमतीपलीकडचे नाते जपल्याने `तरूण भारत’ सहकुटुंब वाचावा असे दैनिक असल्याचेही मत संपादक मंत्री यांनी व्यक्त केले. दरवर्षी `तरूण भारत’चा वर्धापनदिन म्हणजे आठ ते दहा हजार लोकांचा स्नेहमेळावा असतो. पण, यावर्षी कोव्हिडच्या संकटामुळे केवळ मोजक्याच कर्मचाऱयांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम करावा लागत आहे. पुढील वर्षी भव्य स्वरूपात हा सोहळा साजरा करण्याची ग्वाही मंत्री यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय साळुंखे यांनीही शुभेच्छा दिल्या. भाजपा नेत्या सौ. नीता केळकर यांनी `तरूण भारत’ हे संस्थापक संपादक स्व. बाबुराव ठाकुर यांचा वारसा कायम जपत असल्याचे उद्गार काढले. सांगलीकर आणि `तरूण भारत’चे ऋणानुबंध वेगळे आहेत. `तरूण भारत’ची वाचकसेवा उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
`तरूण भारत’ची परंपरा शंभर वर्षापूर्वीची आहे. ज्या भागात `तरूण भारत’ जातो तेथील वाचकांवर मोहिनी घालतो. तेथील लोकांना तो आपला वाटतो. तरूण भारतचा प्रत्येक कर्मचारी, प्रतिनिधी विश्वस्ताच्या भूमिकेतून काम करतो, असे मत `तरूण भारत’चे चीफ मार्केटिंग ऑफीसर उदय खाडीलकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास `तरूण भारत’चे संपादक जयवंत मंत्री, सोशल मीडिया प्रमुख प्रसाद प्रभू, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप.क्रेडीट सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुदत्त पाठक, शाखाधिकारी सुभाष मोरे, जाहिरात व्यवस्थापक संजीव डाळींबकर यांच्यासह `तरूण भारत’ परिवारातील प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. आभार मुख्य प्रतिनिधी संजय गायकवाड यांनी मानले.