प्रतिनिधी / तासगाव
लवेश धोत्रे याच्या खूनप्रकरणी सहाजणांविरूद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी पाचजणांना अटक केली असून त्यांना 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले. तर एकजण पसार असून त्याचा शोध सुरु असल्याचेही ते म्हणाले.
अमोल संतोष धोत्रे यांनी महेश दत्तात्रय दानोळे (वय 19), ऋतिक शिंदे, विक्रांत हरी कांबळे (वय 25), सागर बाळासाहेब कदम (वय 24) यांच्या विरूद्ध फिर्याद दिली आहे. तर तपासात सुनील हाजाप्पा वालेकर (वय 22), अनिकेत उदय चव्हाण (वय 22 )यांची नावे निष्पन्न झाली आहेत. यापैकी ऋतिक शिंदे हा पसार असून अन्य पाचजणांना अटक केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे, 1ग्न5 दिवसापूर्वी माझा सख्खा चुलत भाऊ लवेश सुधाकर धोत्रे व सागर कदम, ऋतिक शितल शिंदे यांच्यात भांडणे झालेली होती. त्यावेळी लवेश धोत्रे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने सागर कदम व ऋतिक शिंदे हे लवेशवर चिडून होते. शुक्रवारी चारच्या दरम्यान लवेशने सागर कदमचा फोन आला असून भांडणे मिटवणेसाठी विटा नाका बोलावल्याचे सांगितले. त्यावेळी लवेश पुढे गेला. त्याच्या पाठोपाठ मी व माझा मित्र गणेश कोळी गेलो.
लवेश सोबत उमेश पवार व विघ्नेश पवार होते. तर पाण्याच्या टाकी रोडवर सागर कदम, ऋतिक शिंदे, विकी कांबळे, महेश दानोळे उभे होते. लवेश याने आम्हाला तुम्ही येथे थांबु नका, आमचे आम्ही मॅटर मिटवतो, असे सांगितल्याने आम्ही सर्वजण बाजूला निघून गेलो.
विटा नाका येथेच एका ऑफिससमोर जाऊन थांबलो असता आरडाओरडा ऐकु आला. त्यामुळे मी लवेशच्या दिशेने पळत गेलो. त्यावेळी महेश दानोळे हातातील कुकरीने लवेशवर वार करीत होता. ऋतिक शिंदे हा चाकुने लवेशला मारत होता. लवेश खाली पडल्यावरही सागर कदम, विकी कांबळे लाथाबुक्यांनी मारहाण करत होते.
लवेश रक्ताच्या थारोळÎात पडल्यावर सागर कदम व इतर दुचाकीवरुन पळून गेले. लवेशला दुचाकीवरुन मी तसेच उमेश पवार व विघ्नेश पवार यांनी जाधव हॉस्पिटल येथे नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून सरकारी दवाखान्यात नेण्यास सांगितले. सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सहापैकी सागर कदम, सुनील वालेकर, महेश दानोळे, अनिकेत चव्हाण, विक्रांत कांबळे याना अटक केली असून शनिवारी तासगाव न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
मुख्य सूत्रधारावर कारवाई करा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेने लवेश धोत्रे खूनप्रकरणी पोलीस उपअधीक्षकांना निवेदन दिले असून संगनमत करून लवेश धोत्रेची निर्घृणपणे हत्या केली आहे. ज्यांनी हत्या केलेली आहे, त्याना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच शितल शिंदे, ऋतिक शिंदे हे घटनेचे मुख्य सूत्रधार असून त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करण्यात यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. |