प्रतिनिधी / शिराळा
बत्तीस शिराळा येथील शिवाजी वसंतराव शिंदे यांनी लॉकडाउन काळात संपूर्ण ज्ञानेश्वरी हाताने लिहून काढली आहे. लॉकडाऊन काळात घरात बसून काय करायचे ? हा प्रश्न सगळ्यांच्यासमोर होता. यातून शिवाजी शिंदे यांना ज्ञानेश्वरी लिहायची कल्पना सुचली, आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहियला घेतली.जशी आहे तशी. जवळपास अडीच महिन्यात संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आहे.
इथून पुढे अनेक वर्षे २०२० लक्षात राहिल. कोरोना आग णि लॉकडाऊनमुळे नातेसंबंधांवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचं जगणं बदलून गेले आहे. पण या लॉकडाऊनला सकारात्मक घेऊन शिवाजी वसंतराव शिंदे यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी हाताने लिहून पूर्ण केली आहे.शिंदे यांना भजनाची आणि ज्ञानेश्वरी वाचनाची आवड आहे. त्यांनी लॉकडाऊन काळात बॉल पेनच्या साह्याने, हाताने चारशे पाणी वहीवर, संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आहे. यासाठी त्यांना साधारण अडीच महिने लागले. विशेष म्हणजे त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे वारंवार लेखन चालू असताना उठावे लागले. पुन्हा पुन्हा हात-पाय धुवून ते ज्ञानेश्वरी लिहिन्यास बसायचे.
कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त दहा ते बारा तासापर्यंत एका जागेवर बसून त्यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली आहे. मधुमेहाचा त्रास असल्याने वारंवार उठावे लागायचे. तरीसुद्धा अशा स्थितीत त्यांनी लिखाणात खंड पडू दिला नाही. ज्ञानेश्वरी हाताने लिहून काढल्यानंतर त्याच्या आयुष्यात खूप बदल झाल्याचे ते सांगतात. ज्ञानेश्वरी वाचून समजत नव्हती; म्हणून लिहून काढली. यामुळे आता ज्ञानेश्वरी चांगली समजायला लागली आहे.
असे ते सांगतात. ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन त्यांना रघुनाथ मारुती कदम यांच्याकडून मिळाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रघुनाथ कदम हे अखंड ज्ञानेश्वरी वाचन करत आहेत. एकादशी, द्वादशी, रविवार गुरुवार असे चार दिवस त्यांच्या घरी भजन असते. अनेक ग्रंथांचे त्यांनी वाचन केले आहे. त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली होती. या प्रेरणेतूनच शिवाजी शिंदे यांनी सुद्धा कोरोना महामारीच्या काळात हाताने ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली आहे.