दिघंची / वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये बंद असलेली ‘कृषी सेवा केंद्र’ लवकरात लवकर सुरू करावीत, अशी आग्रही मागणी दिघंची येथील माणमाती फार्मर प्रोड्यूसर कंपनीने दिघंचीतील शेतकरी बांधवांनी निवेदनाद्वारे तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे केली आहे.
दिघंची व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड केली आहे. सध्या फळ धरण्याची प्रक्रिया सुरू असते. या वातावरणात त्यांना खत व औषधांची अत्यंत गरज आहे. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व कृषी सेवा केंद्र बंद आहेत. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, खत, औषधे व बी-बियाणे यांची सर्व दुकाने बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची मोठी चिंता लागली आहे. औषधा अभावी डाळींबासह अन्य पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी दिघंची गावातील कृषी सेवा केंद्र उघडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर सोमनाथ कुंभार, सोमनाथ सावरकर, सतीश कुंभार, सोपान काळे, केशवराव मिसाळ आदींच्या मान्यवरांसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.