प्रतिनिधी / नांद्रे
शासनाने पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने ग्राम प्रशासनास पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नांद्रे येथे पंचनामे करण्यासाठी पाच अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत परंतु नांद्रेचे तलाठी सासणे यांनी केवळ मंडल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन अनेक कडक निकष लागू केल्याने अनेक बाधित कुंटूबं शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
तलाठी सासणे यांनी महापूर ओसल्यानंतर पूररेषा चुकीच्या पध्दतीने आखल्या आसून काही पूरग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप पूरग्रस्तांतून होत आहे. त्यांना पूरग्रस्तांनी या पंचनामाचे निकष काय आहेत अशी विचारणा केली असता तलाठी सासणे हे पूरग्रस्तांना उरमटपणे उत्तर देत तुम्ही शासकीय कामात अडथळा आणाल तर तुमच्यावर केस करू अशी धमकी देत रेटून पंचनामे करत आहेत. यामुळे अनेक पूरग्रस्त वंचित राहण्याची भिती आसून मर्जीतील लोकांनाच या पंचनाम्यामध्ये पात्र ठरवले जात आहे.
शासनाने प्रशासनातील पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या पथकाच्यावतीने पंचनामे करण्याचा आदेश डावलून केवळ मंडल अधिकारी यांना घेऊन मनमानी पंचनामे करत आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, पूरप्रभागातील ग्रा. पं. सदस्य, पूरग्रस्तांना विश्वासात न घेता कडक निकष लावत आसल्याने पूरग्रस्तांत प्रचंड नाराजी दिसून येत आहे.