भाजपच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
लॉकडाऊन शिथील न केल्यास आजपासून व्यापारी दुकाने उघडणार
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध कडक करा, पण बाजारपेठ बंद करू नका, हातावर पोटं असणाऱ्यांच्या चुली बंद करू नका, अशी मागणी करत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाने आजपासून लॉकडाऊन शिथिल करावा अन्यथा व्यापारी दुकाने उघडतील, असा इशाराही देण्यात आला.
भाजपच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात `आम्ही सांगलीकर’ या बॅनरखाली व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, जीम चालक, मालक, हॉटेल व्यावसायिक, नाभिक संघटना, छोटे व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विश्रामबाग येथील भाजप कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. लॉकडाऊनविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर तेथे लॉकडाऊन करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर, पृथ्वीराज पवार, अतुल शहा, शेखर इनामदार आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. कोरोना काळातील कठोर निर्बंधामुळे जनमानसात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन करण्याचे आणि सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सर्व नियम पाळून सर्व व्यवहार सुरु राहतील असे सांगितले होते. विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांना यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण, सध्या सांगली जिल्हÎात `ब्रेक द चेन’च्या नावाखाली लॉकडाउनच लागू केला आहे. सर्व छोटे मोठे व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे सर्वच व्यवसायिकांचा याला तीव्र विरोध आहे. लॉकडाउनमुळे श्रमिक कष्टकरी, मोलमजुरी करणारे तसेच छोटे व्यापारी यांचे हाल होत आहेत.
गेल्या वर्ष अशाच लॉकडाउनमुळे ते कर्जबाजारी होऊन आर्थिक नुकसानीमध्ये गेलेले आहेत. प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बाजारपेठ बंद करण्याचे आदेश देत तमाम व्यापारी, फेरीवाले, भाजीवाले, उद्योजक, कामगार यांना अडचणीत आणण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने चालू केला आहे. वास्तविक सर्वजण नियम पाळून व्यापार करतील. पण जिल्हा प्रशासनाने महिनाभर सगळेच व्यवहार बंद ठेवायला भाग पाडले आहे व पोलीस बळजबरीने व्यवसाय बंद करत आहेत. हातावरचे पोट असणाऱयांची आर्थिक स्थिती आधीच नाजुक आहे. या लॉकडाउनमुळे जगणे आणखी कठीण झाल्याची व्यथा आंदोलनकर्त्यांनी मांडली. गरिबांच्या पोटाची सोय करा आणि मग खुशाल लॉकडाऊन करा, अशी मागणीही काहींनी केली. शेती आणि शेतमालाचेही मोठे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी व व्यापाऱयांशी चर्चा करुन सध्या सुरु असलेले लॉकडाउन शिथिल करावे, विकेंड लॉकडाउन करावे, सर्व नियमाचे पालन करून सोमवार ते शुक्रवार संपूर्ण बाजारपेठ सकाळी 7 ते रात्री 8 खुली करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने अध्यादेश काढावा, अशी मागणी केली. अन्यथा आजपासून व्यापारी आपापले व्यवसाय सुरू करतील असा इशारा देण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, अतुल माने, नगरसेवक गजेंद्र कुल्लोळी, रेखा पाटील, संजय यमगर, रघुनाथ सरगर, लक्ष्मी सरगर, दरिबा बंडगर, सुजित राऊत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलकांवर गुन्हे दाखल
दरम्यान, कोरोनाचे नियम मोडल्याबद्दल तसेच जमावबंदी असतानाही बेकायदेशीरपणे मोर्चा काढल्याप्रकरणी 10 जणांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, दीपक माने, अतुल माने, अश्रफ वांडकर, किरण भोसले, विश्वजित पाटील, गजेंद्र कुल्लोळी, विराज कोकणे, अतुल शहा आणि आमदार सुधीर गाडगीळ यांचे स्वीय सहाय्यक अमोल कणसे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.