शेतकरी देशोधडीला
शासकीय अंमलबजावणी आवश्यकता
वार्ताहर / वसगडे
अलिकडच्या तिस चाळीस वर्षात झाला नाही असा ११३ मिली मिटर पावसाने शेतकरी आठ दिवसापासून हैराण असताना वादळी वार्यामुळे सलग चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने या परतीच्या पावसामुळे कृष्णा काठच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या वीस तीस वर्षांत असा पाऊस झाला नाही असा अंदाज शेतकरी वर्गाचा आहे.
गतवर्षीच्या महापुरामुळे कृष्णाकाठच्या शेतीचे झालेले अतोनात नुकसान, या वर्षीचा अवेळी झालेला दमदार पाऊस यामुळे नदीकाठचा शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने याचे पंचनामे करुन शेतकर्यांना सावरले पाहिजे. गतवेळचे पंचनामे होऊन सुध्दा बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप पीकांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासनाने जाहिर केलेली कर्ज माफीत नियमित कर्जदाराच्या हाती काही लागले नसल्याने हि योजना चोर सोडून संन्याशाला फाशी अशा प्रकारची झाली आहे. त्यातच भरीस भर म्हणून हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव त्यामुळे शेतकरी प्रचंड तणावाखाली आहे.
महापुराचे दुःख विसरून कृष्णाकाठचा शेतकरी पिक कर्ज काढून परत उभारणीचा प्रयत्न करत असताना परतीचा पावसामुळे ऊस, सोयाबीन, भुईमूग या सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाला आलेल्या आडसाली ऊस लागणी मुळासाहित उन्मळून पडल्याने शेतकर्यांची अवस्था केविलवाणी बनली आहे. आठ दिवसापासुन शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने ऊसाचा खोडव्यामधून कमी उत्पादनाच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल बनले आहेत. खोडवा पिक शेतकरी वर्गासाठी कमी खर्चाचे व फायद्याचे असल्याने हा बोनस शेतकरी वर्गाचे हाती लागण्याची शक्यता कमी झाली आहे. यासाठी शासनाने पीक नुकसान भरपाई, कर्जमाफी योजना ची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. पीक नुकसानीचे पंचनामे लवकर होऊन भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.