आमदार अनिल बाबर यांची मागणी : महापुराच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घेण्याची गरज
प्रतिनिधी / विटा
सध्याच्या महापुरासारख्या आपत्तीतून हजारो मुक्या जनावरांचे जीव वाचवण्यासाठी पशुवैद्यकीय पदविका धारण करणाऱ्यांना बोगस ठरवणारे पत्रक तातडीने स्थगित करा. महापुराच्या पार्श्वभूमीवर या लोकांना तातडीने सहकार्यासाठी सेवेत घ्या, अशी आमदार अनिलराव बाबर यांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्यासह कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे. यात माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांचेही प्रचंड हाल सुरु आहेत. माणसांबरोबरच या पशुधनालाही वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महापूर आलेल्या कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगेसह अनेक नदी काठाच्या गावांमधून माणसांच्या बरोबर जनावरांनाही वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
परंतु खरी समस्या या पुढे सुरु होणार आहे. अनेक गावांतील लोकांनी आपली जनावरेही नवीन स्थलांतरित जागेत आणली आहेत. पशुधन महापुरासारख्या आपत्तीतून नुकतेच बाहेर आले आहे. शिवाय पावसाळी हवा, दूषित अन्न, पाणी यामुळे हि जनावरे आजारी पडली आहेत. त्यांच्यवर तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे.
मात्र महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धक परिषद नागपूर यांच्यावतीने डॉ डी. आर. रामटेके यांनी ९ जुलै रोजी पत्रक काढून पशुवैद्यकीय पदविका धारण करणाऱ्यांना बोगस ठरवत तशी सेवा देणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. परिणामी सरकारी सोडून कोणीही पशु वैद्यकीय तज्ञ अथवा डॉक्टर जनावरांची तपासणी करण्यास धजावत नाहीत. तसेच पशु मालकही अशा डॉक्टरांकडून तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे अनेक मुक्या जनावरांचे उपचाराअभावी हकनाक बळी जात आहेत. ही बाबी मिरज तालुक्यातील आरगचे सरपंच अमरसिंह पाटील यांनी आमदार अनिलराव बाबर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर आमदार बाबर यांनी तात्काळ पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांना संपर्क साधून याबाबत सविस्तर माहिती दिली.
एकट्या मिरज तालुक्यातील ३०० हुन अधिक जनावरे सध्या विविध आजारांनी ग्रासलेली आहेत. तसेच महाराष्ट्रातील पशुवैद्यक किंवा तत्सम पदविका धारण करणाऱ्यांची संख्या तब्बल दीड लाखांहून अधिक आहे. एका बाजूला जनावरांच्या जीवाचा प्रश्नही आहे. शिवाय सर्वात महत्वाचे या दीड लाखांहून अधिकच्या पदविका धारण करणाऱ्यांचा प्रश्न आहे यावर तात्काळ निर्णय घ्या असे आमदार बाबर यांनी मंत्री ना. भरणे यांच्या निदर्शनास आणून दिले त्यावर मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन उद्याच्या उद्या तो आदेश स्थगित करतो असे आश्वासन दिल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले आहे.