प्रतिनिधी / सांगली
पालकमंत्री जयंत पाटील आणि आणि जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यासंबंधीचे पत्र विधानपरिषद सभापतींकडे देण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संबंधित आढावा आणि उपाययोजना यासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीला आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. कोरोनाणासारख्या महत्त्वाच्या बैठकीला विधान परिषद सदस्यांना निमंत्रित करणे महत्त्वाचे वाटत नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री हेसुद्धा विधानपरिषदेचे सदस्य आहेत याचा विसर प्रशासनाला पडला आहे काय असा सवालही आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. या बैठकीला पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून विधान परिषद सदस्यांना डावलण्यात आले की जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला होता याचा खुलासा होण्याची आवश्यकता असल्याची भावनाही सभापतींना देण्यात आलेल्या या पत्रात करण्यात आली असल्याचे आमदार खोत यांनी सांगितले