शिवसेनेच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
ऑनलाईन टीम / सांगली
सांगली पूरग्रस्त नागरिक व्यापारी आणि कारागिरांना मदत करताना पंचनाम्यात कोणतीही अडवणूक होणार नाही. पण किमान एखादा तरी पुरावा दिलाच पाहिजे. शंभर टक्के मदत लोकांना पोहोचण्यासाठी प्रशासन ऑनलाइन पोर्टलद्वारे गतवेळी मदत वाटपातील त्रुटी दूर करेल असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
महापुराची शासनाने जाहीर केलेली मदत वाटप करत असताना पंचनामे मध्ये येणाऱ्या अडचणींबाबत माहिती देण्यासाठी उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, व शिवसैनिक यांच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. २०१९ मध्ये अनेकांना दुसऱ्या टप्प्यातील मदत मिळाली नाही. बॅंक खाते क्रमांक, शाखा क्रमांक चुकीचे ठरेल. त्यामुळे यावेळीही लोक शंका व्यक्त करत आहेत. यावेळी तसे होऊ नये अशी मागणी शिवसेनेने केली.
यावेळी जिल्ह्यात गतीने पंचनामे केल्याबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेचे अभिनंदन केले मात्र तरीही सांगली शहरातील पंचनाम्याच्या वेळी कोल्हापूर रोड, पत्रकार नगर भागात झालेले वाद, असे प्रकार होऊ नयेत यासाठी संबंधितांना सहानुभूतीपूर्वक लोकांचे ऐकून घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात. लोकांच्या कडून भरून घेतल्या फॉर्ममध्ये नुकसानीचे आकडे मान्य करावे, एकाच जागेवर दोन लायसन्स, शॉप लायसन्स असतील तर मान्य करावेत, प्रोफेशनल टॅक्स पावत्या आणून द्या यासाठी आग्रह न धरता एखादा पुरावा मान्य करावा.
एकाच घरात पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील कुटुंबांचे स्थलांतर झाले असले तरी लाभ सर्वांना मिळावा. घरमालक, भाडेकरू वाद टाळावा, प्रत्येकाला शासनाची भरपाई मिळावी या संदर्भाने आपण पाठपुरावा करावा,प्रत्येक पंचनामा या माहितीचे संगणकीकरण करून प्रत्येक प्रकरण एका क्षणात दिसेल आणि ऑनलाईन प्रत्येकाला आपल्या प्रपोजलची माहिती मिळेल, कागद जोडता येतील, त्रुटी दुरुस्त करता येतील अशी व्यवस्था करावी ऑनलाईन पोर्टल द्वारे करावी अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगीतले की, कोणावरही अन्याय होणार नाही. गतवेळी अडचणी आल्यामुळे यावेळी ऑनलाइन पोर्टल चा मार्ग स्वीकारला जाईल, लोकांनी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर राग काढू नये, किमान एखादा पुरावा जोडला पाहिजे, मदत वाटपात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. याकामी गरज पडली तर शिवसेनेचे स्वयंसेवक प्रशासनाला मदत करतील असे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले.