इस्लामपूर/प्रतिनिधी
वादळी पावसाने इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात दैना उडवली. ओढे-नाले दुथडी भरुन वाहू लागल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. इस्लामपूर-सांगली रस्त्यावर प्रकाश हॉस्पिटजवळ रस्त्यावर पाण्याचा मोठा लोंढा वहात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दरम्यान दोन दुचाकी वाहून गेल्याचे वृत्त आहे.
बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. पाऊस रात्री उसंत घेईल,अशी अपेक्षा होती. पण पाऊस रात्रभर धो-धो कोसळत आहे. गुरुवारी सकाळी देखील सूर्यदर्शन न होता,पाऊस कोसळत आहे. पावसाने कहर केल्याने अनेक ओढे पात्राबाहेर आले आहेत. पेठ येथील तिळगंगा ओढ्यावरील गावातील पुलावरील कठडे वाहून गेल्याने महादेववाडी, माणिकवाडी या गावांचा संपर्क तुटला.
पेठ-सांगली रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. प्रकाश हॉस्पिटल दरम्यान या रस्त्यावर प्रचंड प्रवाहात पाणी वाहत असून त्यामुळे जिल्ह्याचा संपर्क तुटला.नोकरी-व्यवसायासाठी दुचाकीवरुन ये-जा करणाऱ्या अनेकांची गैरसोय झाली. धाडस करुन काहींनी हा पाण्याचा प्रवाह पार करण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन दुचाकी वाहून गेल्याचे घटनास्थळी सांगण्यात आले. धोका ओळखून पोलीस पोहचले.पाऊस असाच सुरु राहिल्यास आणखी काही तास वाहतुकीस अडथळा रहाणार आहे.