खानापूर तालुक्यात 11 ग्रामपंचायत यंत्रणा सज्ज
प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यातील निवडणूक जाहीर झालेल्या 13 पैकी 11 ग्रामपंचायती करिता उद्या 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. तांदळगाव आणि भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. गुरुवारी सकाळी मतदान कर्मचारी केंद्रावर रवाना करण्यात आले.
खानापूर तालुक्यात एकूण 34 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलीस कर्मचारी आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर मतदारांची तापमान घेण्यासाठी एक आरोग्य कर्मचारी, असे एकूण सात कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राखीवसह तालुक्यात 280 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तीन विभागीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी 11 आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 11 असे एकूण 305 अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली.
मतदान पथके गुरुवारी सकाळी तिसरे प्रशिक्षण देऊन आणि साहित्य वाटप करून आज नऊ वाहनाद्वारे केंद्रावर रवाना केले. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्र यापूर्वीच सॅनिटाईझ करून घेण्यात आली आहेत. मतदारांना सोशल डिस्टंसिंगच्या अनुषंगाने रांग लावण्यासाठी आवश्यक आखणी करून घेण्यात आली आहे.
प्रत्येक मतदाराची मतदान केंद्रावर आल्यावर रांगेत उभे राहण्यापूर्वी तापमान घेऊन त्याच्या नोंदी ठेवण्यात येणार आहेत. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी यांना आवश्यक मास्क, सॅनिटायजर फेस शिल्ड आदी साहित्य पुरवण्यात आले आहे, असे तहसीलदार शेळके यांनी सांगितले.
तालुक्यामध्ये 11 ग्रामपंचायतिच्या एकूण 91 जागांकरिता 209 उमेदवार रिंगणात आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने भरारी पथक नियुक्त करण्यात आलेला आहे. तालुक्यातील माहुली, नागेवाडी, देवीखिंडी, पारे, मंगरूळ, रेणावी, खंबाळे(भा.), मेंगाणवाडी, शेंडगेवाडी, भिकवडी आणि पोसेवाडी येथे निवडणूक होत आहे.