विटा / प्रतिनिधी
राज्यातील यापूर्वी मुदत समाप्त झालेल्या व डिसेंबर, 2021 ते फेब्रुवारी, 2022 या कालावधीत मुदत समाप्त होणाऱ्या नगरपरिषदांची कच्ची प्रभाग रचना बहुसदस्यीय प्रभाग पध्दती नुसार तयार करुन ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.ही प्रभाग रचना 30 नोव्हेंबर पूर्वी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील विटा, इस्लामपूर, आष्टा आणि तासगाव नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे लक्ष निवडणूक यंत्रणेकडे लागले आहे. आता प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना आल्याने राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत. या प्रत्येक नगरपालिकेत किती प्रभाग वाढणार याबाबत उत्सुकता आहे.
राज्य शासनाने सन 2021 चा महारष्ट्र अध्यादेश क्रमांक 10/2021 दि.02 नोव्हेंबर, 2021 रोजी प्राख्यापित केला आहे. यामध्ये “अ” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. तसेच “अ” वर्ग नगरपरिषदेमध्ये किमान सदस्य संख्या 40 असेल आणि 75 पेक्षा अधिक नसेल. “ब” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे. “ब” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेल आणि 37 पेक्षा अधिक नसेल. तर “क” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 3 ने वाढ केली आहे. “क” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
शासनाच्या दि. 2 नोव्हेंबर, 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनुसार केल्यानुसार सदस्य संख्या निश्चित करुन त्यानुसार कच्ची प्रभाग रचना 30 नोव्हेंबर पूर्वी तयार करुन ठेवावी आणि त्याबाबत आयोगास आवगत करण्यात यावे, असे आयोगाने दिलेल्या आदेशात म्हंटले आहे.