प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील संजय गांधीनगर येथे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलमध्ये एका दाम्पत्यास घरकुल मंजूर करुन देतो म्हणून महापालिकेत खोटी कागदपत्रे दाखल करुन फसवणूक केली असल्याची तक्रार महात्मा गांधी चौकी पोलिसात दाखल झाली. महापालिका बांधकाम विभागाचे अधिकारी भगवान राजाराम पांडव (वय 54, रा. दुर्वांकुर प्लॉट नं. 3 पत्रकारनगर, सांगली) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी वरिष्ठ लिपिकासह दोघा भामट्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वरिष्ठ लिपिक बाळासाहेब भुपाल मल्लेवाडे (रा. सावंत अपार्टमेंट, नदीवेस पाटील गल्ली, मिरज) आणि गणेश बळवंत कांबळे (रा. गंगानगर चर्चजवळ) यांचा समावेश आहे. सदर दोघांनी घरकुल योजनेत सदनिका मंजूर करुन देण्याचे अमिष दाखवून हिना जमखानवाले व मेहबुब जमखानेवाले (रा. मिरज) या दाम्पत्याला 32 हजारांचा गंडा घातला आहे. तसेच खोटी कागदपत्रे जोडून महापालिकेचीही फसवणूक केली असल्याचे पांडव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.