प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या रूग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असतानाच महापालिका क्षेत्रासह जिल्हय़ात प्रशासनाचे नियोजन फेल गेले आहे. कोरोना उपचारारसाठी प्राधिकृत हॉस्पिटल आणि शासकीय हॉस्पिटलमध्येही बेड शिल्लक नसल्याचे कारण सांगून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचारास नकार देण्यात येत आहेत. यापुढे असा प्रकार घडल्यास बेड अभावी कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दगावल्यास प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा नागरिक जागृती मंचने दिला आहे.
जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी याबाबत पालकमंत्री जयंत पाटील, कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. येत्या आठ दिवसांत शहरात 500 बेडचे कोव्हिड हॉस्पिटल सुरू करण्यात यावे, त्यामध्ये शंभर व्हेंटिलेटर, शंभर ऑक्सीजनची सोय करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संपूर्ण जगात कोव्हिड 19 मुळे हाहाकार माजलेला आहे तसाच प्रकार आपल्या जिह्यात सुद्धा हाहाकार माजलेला आहे. तो तुम्ही जाणीवपूर्वक नजर अंदाज करत आहात, अशी सर्व जिह्यातील नागरिकांची धारणा झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह रुग्णांना कोणत्याही रुग्णालयात बेड मिळत नाहीत. यंत्रणा तोकडय़ा पडत आहेत ही परिस्थिती आता पाहवत नाही.सर्वच सहनशिलतेच्या पलीकडचे झाले आहे.
त्यामुळे 1 सप्टेंबर 2020 पर्यंत आपण 500 बेडचे कोणत्याही ठिकाणी कसेही करून त्यात 100 ऑक्सिजन बेड व 100 व्हेंटिलेटर बेडचे हॉस्पिटल उभरावे अन्यथा नाईलाजास्तव बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही साखळकर यांनी दिला आहे. त्याचबरोबर आजपासून बेड मिळाला नसल्याच्या कारणावरून एक जरी रूग्ण दगावला तरी सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.