आमदार सदाभाऊ खोत यांचा आरोप : सोमवारी माझे अंगण, माझे आरक्षण आंदोलन
प्रतिनिधी / सांगली
मराठा समाजाचे आरक्षण हे महाविकास आघाडीच्या सरदारामुळेच गेले आहे. सर्वोच्च न्यायालयात दोन वर्ष त्यांना व्यवस्थितीत मांडणी करता न आल्याने मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे. याविरोधात सोमवारी दहा मे रोजी माझे अंगण, माझे आरक्षण असे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
सदाभाऊ खोत म्हणाले, मराठा समाजातील श्रीमंत आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या राजकीय पुढाऱ्यांना आपल्या समाजातील गरीब व्यक्ती कधीही आरक्षणाने मोठ्या होवू नयेत असेच वाटत होते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांच्या कुचकामी वृत्तीने हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार आरोप करत आहे. पण फडणवीस यांनी दिलेले आरक्षण यांना टिकवता आले नाही. त्यामुळे हे यांचे अपयश आहे. तसेच यापुढील काळात मराठा समाजावर अन्याय होवू नये म्हणून राज्यसरकारने मराठा समाजासाठी १० हजार कोटीचे पॅकेज बजेटमध्ये राखून ठेवावे अशी मागणी त्यांनी केली.