ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हर नसल्याने अनेकांचे मृत्यूः हॉस्पिटल कर्जमुक्त आणि कोरोना रूग्ण कर्जबाजारी झाला
प्रतिनिधी / सांगली
गरीब रूग्णांच्या उपचारासाठी असणारी महात्मा फुले जनआरोग्य योजना जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल आणि जिल्हा प्रशासनाने कृष्णेच्या डोहात बुडवून टाकली आहे. असा आरोप आमदार सदाभाऊ खोत यांनी केला. तसेच जिल्ह्यात मृत्यूदर वाढण्याचे कारण म्हणजे ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हरचा योग्य पुरवठा नसल्याने हे घडले आहे. जिल्ह्याचा वाढता मृत्यूदर हा धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
सदाभाऊ खोत म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट आहे. रूग्णांना बेड मिळत नाहीत. जे रूग्ण ऍडमिट आहेत. त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यांना वेळेवर रेमडेसिव्हर इंजेक्शन प्राप्त होत नाही. याचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर वाढतच चालला आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. तसेच हॉस्पिटलची मनमानी सुरू आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्यावर फक्त नर्स आणि ब्रदरच उपचार करत असतात. डॉक्टर रूग्णांना हातही लावत नसल्याचे त्यांनी सांगितले. या कोरोनाने हॉस्पिटलचालक कर्जमुक्त झाले आणि कोरोनाबाधित मात्र कर्जबाजारी झाल्याचे त्यांनी सांगितले. ही स्थिती बदलण्यासाठी कडक उपाययोजना केल्या पाहिजेत आणि जे हॉस्पिटल रूग्णांना लुबाडत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.