जागोजागी कचऱ्याचे ढीग, सवर्त्र घाणीचे साम्राज्य
कचरा उठाव करावा अन्यथा नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या महामारीत माधवनगरवासीय त्रस्त झाले असताना ग्रामपंचायतचे मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग होऊन घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायतीच्या या हलगर्जीपणाच्या कारभाराचा ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. माधवनगर हे हॉस्पॉट गाव बंदी आहे. अशा या कोरोना महामारीत 20हून अधिक जणांचा बळी तर 100 हून अधिक जणांना याची बाधित झाली आहे. अशी गंभीर स्थिती निर्माण झाली असताना माधवनगर ग्रामपंचायत मात्र सुस्त आहे वार्ड क्रमांक 5 ,6 व हनुमाननगर येथे रस्त्यांचीही अवस्था बिकट असून येथे कचरा उठाव होत नसल्याने येथील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतमध्ये तक्रार देऊन सुद्धा आठ-पंधरा दिवस कचरा उठाव केला जात नाही. तसेच शंभर फुटी जुनी रेल्वे लाईन कचरा डेपो येथे रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पडून आहेत. त्यामुळे गल्लीबोळांमध्ये आता घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्या परिसरात मोकाट जनावरांची झुंड दिसून येत आहे. या वाढत्य़ा घाणीमुळे आता डासांचा प्रादुर्भावही वाढला असून त्या परिसरात डेंगू, मलेरिया साथीच्या आजारांची नागरिकांना भीती वाटू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या अशा भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून ग्रामपंचायतीने सातत्याने कचरा उठाव व औषध फवारणी करावी असे 6नंबर वॉर्डमधील सामाजिक कार्यकर्ता सुमित निकम यांनी ग्रामपंचायतमध्ये पत्र देऊन सुद्धा याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. कचरा उठाव करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.