प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील मालगांव येथे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तरुणाचा खून करण्यात आला आहे. मालगांवातील समाधान हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. पृथ्वीराज उर्फ गोट्या प्रताप भंडारे (वय 27, रा. मळाभाग, सावंत वस्ती मालगांव) असे खून झालेल्या तरुणाचे नांव आहे. याप्रकरणी संशयीत बाबासाहेब केरबा कोडलकर (वय 26) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पृथ्वीराज भंडारे आणि बाबासाहेब कोडलकर या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास हॉटेल समाधानमध्ये दारु पित बसले होते. यावेळी पृथ्वीराज आणि बाबासाहेब हे एकमेकांकडे रागाने बघितल्यावरुन पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी बाबासाहेब कोडलकर याने लोखंडी पाईप घेऊन पृथ्वीराज याच्या डोक्यात मारली. यामध्ये गंभीर मार लागून पृथ्वीराज याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने तो जागीच मयत झाला.
खूनाच्या घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तपासाची चक्रे गतीमान करुन संशयीत बाबासाहेब केरबा कोडलकर याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मयत पृथ्वीराज हा सेवानिवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तो व्यसनाच्या आहारी गेला होता. तर बाबासाहेब कोडलकर हाही व्यसनी आहे. पूवैवैमनस्यातून तरुणाचा खून झाल्याने मालगांवमध्ये खळबळ उडाली आहे.