आष्टा / वार्ताहर
वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील आवटी मळ्यात शेततळ्यात पडून बुडून दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. अजय विजय भिसे (वय24), अजिंक्य रमेश जाधव (वय24) दोघे राहणार पुणे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे असून पॉली हाऊसच्या कामासाठी पुण्याहून ते येथे आले होते.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मिरज वाडी येथील आवटी माझ्याजवळ गायकवाड यांची शेतजमीन आहे या ठिकाणी 30 फूट लांब, 32 फूट रुंद आणि 35 फूट खोलीचे शेततळे आहे. या शेततळ्यात पोहण्यासाठी तीन तरुण सकाळी नऊच्या सुमारास आले होते. यातील एकजण पोहत होता तर दोघेजण शेततळ्याच्या काठावर उभे राहीले होते. दरम्यान अजय भिसे हा तरुण पाय घसरुन शेततळ्यात कोसळला. त्यास वाचविण्यासाठी अजिंक्य जाधव याने शेततळ्यात उडी मारली. दोघे एकत्र आल्यावर पाण्यात बुडण्याच्या भितीने दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. यामुळे दोघेही शेततळ्यात बुडाले. आणि दोघांचा करुण अंत झाला. मिरज वाडी येथे पॉलिहाऊस कामासाठी अनेक कामगार आले आहेत. त्यापैकी हे दोघेजण होते.
ही माहिती मिळताच आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय सिद्ध, पोलीस फौजदार सदामते, हवालदार नितीन पाटील, काकतकर,चालक अयाज शेख घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ मृतदेह बाहेर काढले. आष्टा ग्रामीण रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद आष्टा पोलीस झाली असून मयताचे वडील विजय भिसे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार काकतकर करीत आहेत. या घटनेने मिरजवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.