आमदार सुरेश खाडे यांची माहिती
प्रतिनिधी / मिरज
शहरातील शिवाजी रस्त्याचे चौपदरीकरण आणि कृष्णाघाट रोडवरील उड्डाणपुलासाठी केंद्र शासनाकडून तब्बल 62 कोटी, 68 लाख रुपये मंजूर झाले असून, त्याची निविदाही प्रसिध्द झाली असल्याची माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी गुरूवारी पत्रकारांना दिली. अनेक वर्षांपासून शहरात प्रलंबित असलेले हे दोन प्रश्न यामुळे निकालात निघाले असल्याचे ते म्हणाले. अनुसुचित जाती आघाडीचे प्रदेश चिटणीस प्रा. मोहन वनखंडे यावेळी उपस्थित होते.
शहरातील शिवाजी रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. शास्त्री चौक ते तानंग फाटा या दहा किमी रस्त्यासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती. पण, काही कारणाने ती प्रक्रिया रद्द झाली. त्यामुळे अनेक प्रयत्न करुनही गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता दुरूस्त होत नव्हता. त्यामुळे आत्तापर्यंत मनपाकडून खड्डे दुरूस्तीचेच काम होत राहिले. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे यासाठी माझा सतत पाठपुरावा सुरू होता. शहरातील काही संघटना आणि नागरिकांनीही रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पण, अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश आले आहे, असे आमदार खाडे म्हणाले.