प्रतिनिधी / मिरज
कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आर्थिक विवंचनेतून शहरातील ख्वॉजा वसाहत येथे एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबळबळजनक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे. सलीम गौससाहेब भटकल (वय 47) आणि त्याची पत्नी मरियम बशिर नदाफ (वय 40) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी दाम्पत्याचे नांव आहे. कोरोना, लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे आर्थिक संकट ओढवल्याने या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सलीम याचा रेल्वे जंक्शन येथे पानपट्टीचा व्यवसाय होता. त्याचे कुटुंब अत्यंत गरीब होते. लॉकडाऊनमुळे पानपट्टी बंद पडली. उत्पन्नाचे त्याच्याकडे दुसरे साधनही नव्हते. बचत गट, बँकांच्या हफ्त्यांसाठी तगादा लावला जात होता. त्यामुळे सलीम आणि त्याची पत्नी मरीयम हे दोघेही नैराश्येत होते. आर्थिक संकटाला कंटाळून दोघांनी टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
घटनास्थळी महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहणी करुन पंचनामा केला आहे. दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पती-पत्नीच्या आत्महत्येने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.